सातारा – राज्य शासनाने अमृत योजनेअंतर्गत लोकसंख्यानिहाय माजी वसुंधरा अभियान स्पर्धेमध्ये सातारा, कराड, पाचगणी, महाबळेश्वर या चार नगरपालिका व दहिवडी नगरपंचयत यांनी मोठी बाजी मारली आहे. यामध्ये लोकसंख्यानिहाय प्रवर्गामध्ये सातारा, कराड, पाचगणी, दहिवडी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. महाबळेश्वर नगरपालिका तृतीय आली आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना “उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आह.े
सातारा नगरपालिकेला या योजनेअंतर्गत सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. पर्यावरण दिनाचे निमित्त साधून नगरविकास विभागाचे अपर सचिव मनोहर बंदपट्टे यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांतर्गत नगरपालिकांचे माझी वसुंधरा अभियानाचे निकाल सोमवारी जाहीर केले. एक लाख ते तीन लाख लोकसंख्येच्या गट वर्गात सातारा नगरपरिषदेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.
हा गुणानक्रमांक सातारा नगरपालिकेने विविध उपक्रमांच्या जोरावर मिळवला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत डेस्कटॉप असेसमेंट करता साडेसात हजार गुण ठेवण्यात आले होते. यामध्ये सातारा नगरपालिकेने तब्बल 96 टक्के गुण प्राप्त केल्याची माहिती देण्यात आली. या स्पर्धेत भूमी थिमॅटिक मधील सातारा नगरपालिकेची उच्चतम कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि. 5 जून रोजी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सातारा पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे सातारा पालिकेला सहा कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. यामध्ये नगरपालिकेने मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, फुलपाखरू उद्यान, रोपवाटिकांची निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी नाले यांचे पुनर्जीवन सौर उर्जेवर चालणारे प्रकल्प विद्युत वाहनांना प्रोत्साहन इत्यादी उपक्रम राबवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
–