मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २९४ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शनिवारी (25 एप्रिल) महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये २९४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक सध्या लॉकडाऊन कधी संपणार याबाबत सर्व सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट्स व मेसेजेस पसरवत आहेत. त्यामुळे नागरिकामध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
त्यामुळे महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती व आवाहन केले आहे की, कृपया अशा मेसेजेस व पोस्ट्सवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर असा काही मजकूर फॉरवर्ड करून आला असेल तर त्याची केंद्र सरकार व राज्य सरकारकडून वेळोवळी ज्या नियमावली व आदेश काढतात त्याच्या बरोबर खात्री करून घ्या. जर फॉरवर्ड करून आलेला मेसेज किंवा पोस्ट चुकीची असेल तर तुम्ही ती पुढे पाठवून, अफवा पसरवू नका अन्यथा तुमच्यावर पण कायदेशीर कारवाई होऊ शकते. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.