मुंबई – भारतात गुरुवारपासून सुरू झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेवर पावसाचे सावट कायम राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यातच या स्पर्धेत होत असलेल्या 48 सामन्यांपैकी केवळ दोन्ही उपांत्य लढती व अंतिम लढतीसाठीच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, असं आयसीसीने जाहिर केलं आहे. मात्र, त्यापूर्वीच्या सामन्यांत पावसाच्या व्यत्ययाने खेळ होऊ शकला नाही तसेच सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाणार आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दरम्यान, एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला इंग्लंड विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने आजपासून अहमदाबाद येथे प्रारंभ झाला. या सामन्यात सलामीवीर डेव्हन कॉनवेची दीडशतकी तर राशीन रवींद्र याची शतकी खेळी यांच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने गुरुवारपासून सुरू झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
Two quickfire hundreds from Rachin Ravindra and Devon Conway helped New Zealand to a comfortable win in the #CWC23 opener 👊#ENGvNZ 📝: https://t.co/9XyPD7lF90 pic.twitter.com/qR6tnjQLGB
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 5, 2023
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा औपचारिकतेनुसार 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत व पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी होणार असल्याचेही बीसीसीआयने जाहीर केले आहे.
अरजीत सिंग, रणबीर कपूर यांच्या समवेत प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या कार्यक्रमाद्वारे या स्पर्धेच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र, आता ही योजना रद्द केल्याचे बोलले जात आहे. अर्थात याबाबत बीसीसीआयने कोणतेही स्पष्ट कारण दिलेले नाही. मात्र, तिकीट विक्रीबाबत झालेला गोंधळ, सामन्यांच्या तारखांबाबत सातत्याने बदलत जाणारे वेळापत्रक व अनेक आजी माजी खेळाडूंनी केलेली टीका यामुळेच हा सोहळा होणार नसल्याचे सांगितले जात आहे.