मुंबई – मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पुन्हा करोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने पुन्हा कडक पावले उचलली आहेत. मुंबईत 18 (आज मध्यरात्री) सप्टेंबरपासून कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटलें आहे.
केवळ अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा नियम कडक करण्यात आले आहेत.
दरम्यान, नागपूरमध्येही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.