मुंबई – सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
यासंदर्भात राज्य सरकारने जीआर जारी करून सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती.
ओबीसी समाजाचे असलेले विजय वडेट्टीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या मंत्री वडेट्टीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवार यांनी स्वीकारावी, अशी त्यांना विनंती केली होती.
अजित पवारांनीही सारथी संस्थेची जबाबदारी त्यांच्या अखत्यारितील नियोजन विभागाकडे घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, कॉंग्रेसचा सुरुवातीला याला विरोध होता. अखेर यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारने ‘सारथी’ संस्थेकडे दुर्लक्ष केले असून मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता.