राहाता – शासकीय कामाच्या नावाखाली यापूर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा झाला. त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, म्हणून सर्व शासकीय कामांकरिता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण सरकार घेणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. “शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांसह अस्तगाव आणि पंचक्रोशीतील गावांमधील नागरिकांच्या भेटी घेऊन ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रांताधिकारी माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय अधिकारी विलास गायकवाड, जलसंपदा विभागाचे महेश गायकवाड, बांधकाम विभागाचे देविदास धापटकर उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, “शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांचे प्रश्न आणि शासकीय कार्यालयात कागदपत्र किंवा योजनेचा लाभ मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची आता सरकारने मुदतही 30 ऑगस्टपर्यंत वाढवल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या वाळू धोरणात घरकुलाच्या लाभधारकांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शिवरस्ते, पाणंद रस्ते जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले आणि नकाशात दिसणारे रस्ते तातडीने मोकळे करून देण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. रोवरच्या साहाय्याने मोजणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात निकाली निघत असून, याचाही मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कृषी विकासासाठी राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून, पूर्वी आपण कोरडवाहू शेती अभियानातून विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला होता. त्याच धर्तीवर आता मागेल त्याला शेततळे, शेडनेट अस्तरीकरणासाठी कागद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठी शेती महामंडळाच्या जमिनीचा जनहितार्थ उपयोग करून घेण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून, साकुरी येथील पाणी योजना, मुस्लिम समाजाकरिता कब्रस्थान आणि घनकचरा प्रकल्पासाठी या माध्यमातून जागेची उपलब्धता होईल. औद्योगिक विकासासाठी आयटी पार्क, लॉजेस्टिक पार्क उभारून रोजगारनिर्मितीला या जागेची मोठी मदत होणार असल्याचा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी केला.