सचिन इथापे
भुईंज – एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणारा सोशल मीडिया शेती आणि शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरत आहे. हवामानातील बदलामुळे अचूक हवामान अंदाज घेतल्याशिवाय शेती करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत अचूक हवामान बदल, घरगुती बी बियाणे, पशुधन, शेती अवजारे, तयार शेतीमालाची खरेदी विक्री या सर्वांसाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत.
शेतीविषयक माहिती व खरेदी विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या अनेक साइट्स वापरत आहेत. अतिवापरामुळे समाजात एकीकडे सोशल मीडियाचे दुष्परिणाम दिसत असताना शेतकऱ्यांसाठी मात्र हे माध्यम वरदान ठरले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. इंटरनेटच्या आधारे क्षणात परिसरातील वार्ता सहज उपलब्ध होतात. त्यात बळीराजाही आता मागे राहिला नाही. शेतीच्या हंगामाची तयारी करताना शेतकरी मोबाइल फोनचा आधार घेत आहेत. परिसरातील शेतीविषयक माहिती बरोबर दुसऱ्या भागातील प्रयोगशीलता सहजपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होत आहे. आता मान्सून जवळ आल्याने बळीराजा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला आहे. खरीप पूर्व मशागतीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. पेरणी व विविध भाजीपाला फळबाग आदींच्या लागवडीचे त्यात खत व्यवस्थापन, पिकातील अंतर, औषध फवारणी त्यांची मात्रा आदींची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने यासाठी शेतकरी सोशल मीडियाचा आधार घेत आहे. तालुका तसेच गावपातळीवर सोशल मीडियाचे ग्रुप करून विविध पिके त्यांचे लागवड करण्याच्या पद्धती आदींच्या माहितीची देवाण-घेवाण शेतकरी वर्ग करत आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकरी आपल्या जवळील बियाणे पशुधन यांची जाहिरात करून खरेदी विक्री करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची पेरणी व लागवडीचे व्हिडिओ शेअर करत आहेत. कमी खर्चात कशाप्रकारे चांगले पीक घेता येईल याची माहिती शेअर करत आहेत.
काळजी घेणे गरजेचे
व्हॉट्स ऍप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी माध्यमांवर रोज अनेक लिंक मोबाइलवर येत असतात. त्यांना कनेक्ट होण्यापूर्वी त्यांची शहानिशा करण्याची गरज आहे. नाही तर आर्थिक फसवणुकीच्या प्रकार घडू शकतो. यासाठी शेतकरी बांधवांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पिकांबाबत येणारा सल्ला व माहिती याची शहानिशा करून अंमलात आणणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागू शकते.