शिर्डी – शिर्डी व पंचक्रोशीतील गोरगरिबांना, संस्थान कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी साई संस्थानतर्फे उभारण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक संकुलाचे काम पूर्ण झाले आहे. येथील मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे; मात्र त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश कोपरगाव, लोणी व इतर ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
साई संस्थानतर्फे 230 कोटी रुपये खर्च करून निमगाव हद्दीत साई संस्थानचे नवे शैक्षणिक संकुलाचे काम पूर्ण झाले आहे. पदवीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी मिळणार आहे. जवळपास पंचवीस ते तीस गावांतील विद्यार्थ्यांना अगदी अल्प शुल्कात ही व्यवस्था असल्याने सर्व पालक वर्गाचा आर्थिक बोजा कमी होऊन विद्यार्थ्यांना बाहेरगावी महागड्या कॉलेजमध्ये डोनेशन देऊन संघर्ष करण्याची गरज नाही.
विशेष बाब म्हणजे साई संस्थानच्या या नूतन शैक्षणिक संकुलात अद्ययावत अशा सुविधा आहेत त्यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाच्या माध्यमातून आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना इनडोअर गेम, स्वीमिंग पूल, कॉम्प्युटर लॅब, अद्ययावत ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेचे क्लास, नीट, सीईटीचे शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. एकंदरीतच या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचा कल आहे परंतु या शैक्षणिक संकुलाचा ग्राउंड रिपोर्ट घेतला तर एक भयावह परिस्थिती समोर आली आहे. ती म्हणजेच कॉलेजच्या या परिसरात अनेक अवैध दारूचे अड्डे आहेत.
अनेक ठिकाणी टार्गेट तरुण याच रोडवर दुचाकीवर बसून स्टंटबाजी करतात, तर अनेक पायी येणाऱ्या विद्यार्थिनींना छेडछाडीसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सुरक्षेच्या कारणामुळे इच्छा असूनही प्रवेश घेता येत नाही. कारण आजपावेतो या परिसरात अनेक गंभीर घटना घडल्या असून, त्याचे रेकॉर्ड शिर्डी पोलीस स्टेशनला आहे. परंतु येथील अवैध दारूचे अड्डे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण यावर कायमचाच पायबंद घालण्यात शिर्डी पोलिसांना अपयश आले आहे.
साई संस्थानचे कर्मचारी, सुरक्षारक्षक व शिक्षक वर्गसुद्धा दहशतीखाली काम करत आहे. यावरून या ठिकाणच्या दहशतीच्या वातावरणाची कल्पना न केलेली बरी अशीच चर्चा पालकवर्गात सुरू आहे. वास्तविक याची सर्वस्वी जबाबदारी ही साई संस्थान प्रशासन व पोलीस प्रशासन यांची असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची गॅरंटी नसल्याने अनेक पालकांनी आपल्या मुला-मुलींचे प्रवेश हे कोपरगाव, लोणी व इतर ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ही बाब मोठी गंभीर आहे. जर हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि शासकीय निवासस्थान शेजारीच आहे की ज्याठिकाणी राज्यपाल, अनेक मंत्री, न्यायाधीश, सरकारी अधिकारी मुक्कामी थांबत असेल, तर त्यालगत असणारे अवैध व्यवसाय आजही सर्रासपणे सुरू कसे? असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहे.
आमची मुलं-मुली आम्ही साई संस्थानच्या भरवशावर कॉलेजला पाठवतो. मात्र, तेथील रस्त्यावरचे वातावरण पाहून कायमच भीती मनात घर करून राहते. ती म्हणजेच आमचा मुलगा-मुलगी घरी सुरक्षित येईल का? पोलिसांनी यावर कायमचाच तोडगा काढावा ही विनंती मधुकर नारोडे यांनी केली आहे.