मुंबई : बिहार आणि उत्तर प्रदेशला विशेष रेल्वे सोडणार असल्याच्या अफवेमुळे मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर हजारो स्थलांतरीत जमा झाल्याने अभुतपूर्व स्थिती निर्माण झाली. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बिहार आणि उत्तर प्रदेशला जाण्यासाठी मजुरांसाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे, अशी अफवा पसरली. त्यामुळे सुमारे चार ते पाच हजार स्थलांतरीतांचा जमाव वांद्रे रेल्वे स्थानकावर जमला. स्थानकावर येण्यास परप्रातीयांनी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरवात केली. पाहता पाहता काही तासांत काही हजार मजूर जमा झाले.
यातील काहींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून विशेष रेल्वे सोडणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती.
दरम्यान, ज्यांच्याकडे श्रमिक रेल्वेने जाण्याचा पास आहे, अशा सुमारे हजार जणांना थांबवून घेऊन पोलिसांनी इतरांना तेथून पिटाळून लावले. पोलिस आणि रेल्वे प्रशासन स्थलांतरीतांना पिटाळण्यात व्यस्त असताना विशेष रेल्वेची अफवा पसरवल्याबद्दल पोलिसांनी चार जणांना अटक केली.
अफवांचे पेव
विशेष रेल्वे गाड्या सोडणार असल्याच्या अफवांचे पेव देशभर फुटल्याचे चित्र आहे. विशेष रेल्वेसाठी भोपाळ आणि चंदिगढमध्येही गर्दी उसळल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.