भाऊसाहेब वाडगे
मिरजगाव – लॉकडाऊनमध्ये सरकारने काही अंशी सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे काही दुकानेही उघडली आहेत. मात्र नागरिकांनी रस्त्यावर सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला. क्रांती चौक, बाजारतळ, कापडबाजार आदी ठिकाणी दुकाने उघडल्याने कमालीची गर्दी झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. भाजी व फळे विक्रेत्यांनीही नियम धाब्यावर बसविल्याने भाजी घेण्यासाठीही नागरिकांची झुबंड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.
सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि.3) दुकाने उघडण्यास मोकळीक दिली. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना पहायला मिळाले. भाजी व फळ विक्रेत्यांना ग्रामपंचायती ठराविक अंतरावर चौकोन आखून दिले होते. सुरूवातीला भाजी व फळे विक्रेत्यांनी नियमांचे पालन केले. मात्र काही वेळातच भाजी विक्रेते एकाच रांगेत बसले. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी वाढली.
दुकानाच्या काउंटरवर गर्दी करत असून, काही दुकानदारांनी बांधलेले बांबू, दोऱ्या काढून घेतल्या आहेत. त्यामुळे ग्राहक थेट दुकानात जात आहेत. त्यामुळे करोनाचा धोका वाढला आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीने मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. मागील आठवड्यात या पथकाने कारवाई केली. मात्र मागील आठ दिवसांपासून ही कारवाई थंडावली आहे. त्यामुळे अनेकजण विना मास्क फिरताना दिसत आहेत. मास्क नसेल, तरी त्यांना कुणी विचारतही नाही. त्यामुळे नागरिकांची मनमानी सुरू झाली आहे.