रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्याने खातेदार, ठेवीदार भयभीत
पिंपरी – पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बॅंकेने पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध घातल्याने मंगळवारी (दि. 24) बॅंकेच्या शहरातील विविध शाखांमध्ये नागरिकांनी पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधानुसार खातेदारांना प्रत्येकी एक हजार रुपयेच देण्यात येत होते. त्यामुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात खातेदारांना पैसे दिले जात होते.
रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधानुसार बॅंकेत बचत, चालू किंवा ठेव खाते असणाऱ्या खातेदारांना एक हजार रुपयेच काढता येणार आहेत. तसेच, बॅंकेला मुदत ठेव स्वीकारता येणार नाही. कर्ज वाटपाला देखील बंदी घातली आहे. सध्या सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू आहेत. बॅंकेच्या ग्राहकांना याबाबतची माहिती एसएमएसद्वारे देण्यात आली. त्यामुळे सकाळपासूनच बॅंकेमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.
शहरातील रहाटणी, डांगे चौक (थेरगाव), वाकड, मोशी, आकुर्डी, रावेत, काळेवाडी येथील शाखांमध्ये नागरिकांनी पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. डांगे चौक येथील शाखेत दुपारी लोकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केल्याने येथे पोलिसांना पाचारण केले होते. पोलीस बंदोबस्तातच येथे खातेदारांना पैसे देण्यात येत होते. खातेदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमसी बॅंक व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
“पीएमसी’ बॅंकेकडून लोकांचे पैसे लवकरात लवकर मिळायला हवे. त्यासाठी बॅंकेने आवश्यक कार्यवाही करावी. कष्टाने जमविलेले पैसे बॅंकेत अडकून पडल्याने आमची गैरसोय झाली आहे.
– मयूर शिंदे, नागरिक.