वाई (प्रतिनिधी) – उन्हाळ्यामुळे वाई तालुक्याच्या ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत कमी झाले असून अन्नाच्या शोधात आलेली रानडुकरे उभ्या पिकात घुसून प्रचंड नासाडी करत आहेत. सोनगीरवाडी (वाई) येथील शेतकरी विकास सावंत यांच्या शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून तीस गुंठ्यातील उसाची नासधूस केली आहे. या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संपूर्ण तालुक्यात हजारो एकर क्षेत्रातील उभ्या पिकांचे रानडुकरे व अन्य भटक्या प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे. त्यात उसाचे नुकसान सर्वाधिक आहे. रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. रानडुकरांचा त्रास होऊ नये यासाठी शेतकरी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत. संपूर्ण क्षेत्र साडीने लपटणे, आवाज करणारी पत्र्याची डबडी बांधणे, थायमेट घालणे, असे उपाय करूनही रानडुकरे पिके फस्त करत आहेत. संबंधित विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळते. त्यासाठी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. तसे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना वन विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल, वन विभाग, वाई