मुंबई – भारतीय संघाला एखाद्या स्पर्धेत किंवा एखाद्या सामन्यात पराभव झाला की लगेचच टीकाकारांची लेखणी सुरु होते. टीका स्वीकारणे आमचे कर्तव्य असते हे देखील मान्य आहे पण टीका करताना भान राखले जावे, असे मत भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाकडून अपेक्षीत कामगिरी झाली नाही व आपल्याला आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. पण अशाच प्रसंगी खरेतर खेळाडूंना पाठींब्याची गरज असते हे देखील टीकाकारांनी समजून घेतले पाहिजे.
भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत त्यामुळे पराभवामुळे टीका होणे स्वाभाविक आहे. मात्र, कधीकधी भारतीय संघावरील टीका खूप कठोर असते. याच काळात प्रत्येकाने टीका करताना जबाबदारीचेही भान ठेवावे, असेही ते म्हणाले.