मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसतोडणी मजूर देण्याच्या बहाण्याने एकूण 71 लाख 12 हजार 999 रुपयांना चुना लावला आहे. या सात ऊसतोड मुकादमांपैकी तिघांना मंचर पोलिसांनी अटक करून घोडेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवार (दि. 10) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरीत पाच जणांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मंचरचे पोलीस निरिक्षक सुधाकर कोरे यांनी सांगितले. यातील सात आरोपी जळगाव जिल्ह्यातील तर एक राहुरीमधील आहे.
श्रावण जगन राठोड (वय 40), नितीन पंडित पाटील (वय 38, रा. चंडीकावाडी, ता. चाळीसगाव) अनिल पंडित जाधव (वय 42 रा. राहुरी, ता. संगमनेर) असे कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. रमेश बबन राठोड, कैलास रायसिंग चव्हाण, अमरसिंग गबरु राठोड, कैलास छत्रु राठोड (चौघे रा. चंडीकावाडी, ता.चाळीसगाव), अनिल पंडीत जाधव (रा. बोढरे, ता. चाळीसगाव) असे फारर असणाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 5 ऑगस्ट 2020 ते 11 जानेवारी 2021 दरम्यान पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाकरिता ऊस वाहतुकदार म्हणून नवनाथ शिंदे (रा. साकोरे, ता. आंबेगाव) यांनी ऊसतोड मुकादम श्रावण जगत राठोड (वय 40 रा. चंडीकावाडी ता. चाळीसगाव जि. जळगांव) बरोबर करार करून घेवून करारनाम्याप्रमाणे भीमाशंकर कारखान्याने शरद बॅंक पारगाव येथील बॅंकेत नवनाथ शिंदे यांच्या खात्यात 4 लाख 42 हजार रुपये जमा केले.त्यानंतर राठोडने ऊसतोडणी मजुरांना पैसे देण्यासाठी मागणी केल्यानुसार 9 लाख 27 हजार 999 रुपये नवनाथ शिंदे यांच्याकडून रोख, आरटीजीएस, गुगल पे आणि मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून घेतले.
मात्र, राठोडने ऊसतोडणीसाठी मजूर न देता शिंदे यांची आर्थिक फसवणूक केली. त्याचप्रमाणे रमेश राठोडने 26 लाख 50 हजार, अनिल पंडीत जाधवने 7 लाख 50 हजार, कैलास रायसिंग चव्हाणने 9 लाख 50 हजार, अमरसिंग गबरु राठोड 8 लाख 50 हजार, कैलास छत्रु राठोडने 5 लाख, नितीन प्रल्हाद पाटीलने 4 लाख 85 हजार असे एकूण 71 लाख 12 हजार 999 रुपये नवनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच इतर सात ते आठ जणांना परत न करता तसेच भीमाशंकर कारखान्यास ऊसतोडणीसाठी केलेल्या करारनाम्याप्रमाणे मजूर न पुरविता आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, निलेश खैरे, अजित मडके, विठ्ठल वाघ, योगेश रोडे पथक चाळीसगावत गेले आणि तिथून श्रावण राठोड, नितीन पाटील यांना तर अनिल जाधवला राहुरीतून अटक केली. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, मंचरचे निरिक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक सागर खबाले करीत आहे.
…तर त्यांनीही तक्रार द्यावी
अटक आरोपींनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता असल्याने ज्यांना याबाबत तक्रार करावयाची आहे, त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी.असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी केले आहे.