नवी दिल्ली – करोनामुळे केवळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग संकटात आहे. अशा वेळी देशवासियांचा जीव महत्त्वाचा आहे क्रिकेट नव्हे. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) होईल की नाही ते मी सांगू शकत नाही पण, देश हितापेक्षा क्रिकेट नेहमीच दुय्यम राहील, असे स्पष्ट मत क्रिकेटपटू हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन देशातील आयपीएलसह सर्व स्पर्धा रद्द करणेच आवश्यक आहे. आज देशातील जनता सुरक्षीत राहिली पाहिजे. खेळ काय नंतरही घेता येतील. देशात लॉकडाऊन आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सरकारला सहकार्य केले पाहिजे. घरातून बाहेर न जाता आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही हरभजन याने सांगितले.
एक भारतीय म्हणुन माझे प्राधान्य नेहमीच जनतेच्या हिताला राहील क्रिकेटला नव्हे. आज सरकार, पोलीस, स्वयंसेवक जनतेसाठी घराबाहेर आहेत, त्यामुळे त्यांना आपण अन्य काही मदत करु शकत नाही मग निदान घरातच थांबुन त्यांना हे तरी सहकार्य करु शकतो. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही प्रत्येक राज्याचे सरकार देत आहे, त्यामुळे विनाकारण घाबरुन घराबाहेर येऊन कोणत्याही गोष्टींचा अनावश्यक साठा करणे योग्य नाही, असेही त्याने स्पष्ट केले.
मजुरांचाही विचार व्हावा
देशातील अनेक कामगार तसेच मजूर अन्य राज्यांत काम करण्यासाठी येतात. सरकारने या मजुरांचीही काळजी घ्यायला हवी. आपापल्या घरी जाण्यासाठी हे मजूर गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे, त्यांना धीर देण्याची गरज आहे. काल दिल्लीतील बस स्थानकावरच गर्दी पाहून खूप चिंता वाटली. त्यांना विश्वास द्यायला हवा, की ते जिथे आहेत तिथेच सुरक्षीत आहेत, तरच असे चित्र दिसणार नाही, असेही हरभजनने सांगितले.