विक्रम कुंभार
हेळगाव -चैत्र महिना म्हटलं की, गावोगावच्या यात्रा व जत्रांचा हंगाम सुरू होतो. नुसता जत्रा हा शब्द उच्चारला तरी अंगात नवचैतन्य संचारते. सातारा जिल्ह्यातील जवळपास पन्नास टक्के गावच्या यात्रा चैत्र महिन्यात असतात. प्रत्येक गावचे ग्रामदैवत वेगळं आणि त्या ग्रामदेवताची यात्रा ते गाव प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करते. यंदा मात्र यात्रा-जत्रांवर करोनाचे सावट आहे. त्यामुळे “पाव्हणं… औंदा यात्रा नायं बरं का..! असेच सांगताना दिसत आहेत.
यात्रा जरी एका दिवसाची असली तरी त्याची तयारी मात्र अगोदर महिनाभर सुरू असते. लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत प्रत्येक वर्षीचा यात्रेचा दिवस जीवनात एक आनंद मिळवून देऊन जात असतो. पै-पाहुणे नातीगोती, मित्रमंडळी यांना यादिवशी आदराने निमंत्रण दिले जाते. आणि ज्याप्रमाणे लोक देवाची सेवा मनोभावे करतात, तशीच सेवा ही यात्रेच्या निमित्तानं आमंत्रित केलेल्या पै-पाहुण्यांची केली जाते. यामध्ये बहुतांश यात्रा मांसाहारी असतात. प्रत्येक गावच्या रुढी, प्रथा, परंपरेनुसार गावची यात्रा भरते.
मात्र, यंदा या उत्साहावर करोना विषाणूचे विरजण पडले आहे. जगाला या महामारीने विळख्यात घेतले आहे. भारतातही करोनाचा फैलाव होत आहे. महाराष्ट्रातील मोठं मोठ्या देवस्थानासह अगदी गावापर्यंत सर्व मंदिरे मस्जिद, गुरूव्दारे, दर्गा भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महामारीपासून वाचवण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. तर, मुख्यमंत्री उद्धवर ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे.
याचा फटका चैत्र महिन्यातील यात्रा, जत्रांना बसला आहे. आपले पै-पाहुणे, मित्र आप्तेष्ट यांच्या पाहुणचारांची पारंपरिक पध्दत व ग्रामदैवताची मनोभावे पूजा करण्यासाठी गावोगावचा प्रत्येकजण सर्वधर्मिय नागरिक या दिवसाची वाट पाहत असतो. यंदा मात्र यात्रा-जत्रा होणार नाहीत. त्यामुळे कोणाला निमंत्रित करण्याचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमूड झाला आहे. मात्र, आपण जगलो तर पुन्हा यात्रा करू, असे सांगत औंदा यात्रा नाय बरं का..! असेच सांगण्याची वेळ आली आहे.
जगलो-वाचलो तर पुन्हा यात्रा-जत्रा जगावर करोनाचे मोठे संकट आहे.
वैद्यकीय क्षेत्रात आम्ही बाप असे म्हणून आपली पाट थोपटणाऱ्या देशांनी अक्षरशः नांगी टाकली आहे. करोना व्हायरसवर रामबाण उपाय शोधण्यात ते अपयशी ठरले आहेत. यावर एकच उपाय म्हणजे स्वतः व परिवाराला होम क्वारंटाइन (घरीच थांबणे) करून घेणे. यासाठी संपूर्ण भारत बंद आहे. त्यामुळे आपण या महामारीवर मात करू शकलोतर पुन्हा मोठया जोमाने यात्रा-जत्रा करू असेच म्हणण्याची वेळ आली आहे.