पुणे : 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-वेस्टइंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना होणार आहे. हा भारताचा 1,000 वा एकदिवसीय सामना असणार आहे. या बरोबरच भारत 1000 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारा पहिला संघ ठरेल. या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, भारताने 2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा 900 वा एकदिवसीय सामना खेळला.
अशी झाली सुरुवात…
भारत एकदिवसीय क्रिकेट इतिहासात 1000 सामने खेळणारा पहिला संघ ठरणार आहे. भारताने 1974 मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. सर्वाधित सामने खेळण्याच्या बाबतीत भारतानंतर ऑस्ट्रेलिया दुसर्या स्थानी आहे. त्यांनी 958 सामने खेळले आहेत. यामध्ये तिसर्या स्थानी पाकिस्तान (936 सामने), श्रीलंका (870 सामने) आणि वेस्ट इंडिज (834 सामने) यांचा क्रमांक लागतो.
518 सामन्यांमध्ये विजय
आतापर्यंत भारताने 999 एकदिवसीय सामन्यांपैकी 518 जिंकले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी (581) या दोन संघांनी 500 हून अधिक एकदिवसीय विजय मिळवले आहेत. या दरम्यान भारताने 431 सामने गमावले आहेत, तर नऊ सामने बरोबरीत सुटले आहेत. भारताची विजयाची टक्केवारी 54.54 आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा प्रवास
पहिला सामना (1974) : भारताचा इंग्लंडकडून पराभव (कर्णधार: अजित वाडेकर).
50 वा सामना (1983) : भारताकडून पाकिस्तानचा पराभव (कर्णधार: कपिल देव).
100वा सामना (1986) : भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत (कर्णधार: कपिल देव).
200वा सामना (1992) : भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत (कर्णधार: मोहम्मद अझरुद्दीन).
300वा सामना (1996) : भारत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत (कर्णधार: सचिन तेंडुलकर).
400वा सामना (1999) : भारताकडून केनियाचा पराभव (कर्णधार: मोहम्मद अझरुद्दीन).
500वा सामना (2002) : रद्द (कर्णधार: सौरव गांगुली).
600वा सामना (2005) : भारताकडून श्रीलंकेचा पराभव (कर्णधार: वीरेंद्र सेहवाग).
700वा सामना (2008) : भारताकडून इंग्लंडचा पराभव (कर्णधार: धोनी).
800वा सामना (2012) : भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत (कर्णधार: धोनी).
900वा सामना (2016) : भारताने न्यूझीलंडचा पराभव केला (कर्णधार: धोनी).
सर्वाधिक धावा
निवृत्तीनंतर जवळपास एक दशक उलटूनही तेंडुलकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.83 च्या उल्लेखनीय सरासरीने 18,426 धावा केल्या आहेत. यामध्ये विक्रमी 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे.
सर्वाधिक बळी
दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. 17 वर्षांच्या कारकिर्दीत कुंबळेने 271 एकदिवसीय सामन्यांमध्ये 30.89 च्या सरासरीने 337 बळी घेतले आहेत. कुंबळेनंतर यामध्ये माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने 315 बळी घेतले आहेत. भारतासाठी 300 हून अधिक एकदिवसीय बळी मिळवणारे ते दोनच गोलंदाज आहेत.
इतर आकडेवारी
161- श्रीलंकेविरुद्ध खेळले सर्वाधिक एकदिवसीय सामने
93- श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय
5 बाद 418 धावा ही भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. जी 2011 मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवली होती. तर 2000 मध्ये शारजाहमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत सर्वात कमी 54 धावांवर सर्वबाद झाला होता.