-अमित डोंगरे
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत एक वेगळेच वळण लागले आहे. ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली त्यालाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले नाही. सूर्यकुमार यादव हे या खेळाडूचे नाव. त्याने गेले 10 पेक्षा जास्त वर्षे रणजी तसेच प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली. तरीही त्याच्या नावाचाही विचार होऊ नये याचे आश्चर्य वाटते.
माजी कसोटीपटू सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती कोणाच्या इशाऱ्यावर तर काम करत नाही ना अशी शंका येइल अशी या मालिकेसाठी संघ निवड करण्यात आली आहे. जे सूर्यकुमारच्या बाबतीत घडले तेच थोड्या वेगळ्या पद्धतीने रोहित शर्माच्या बाबतीतही घडले. आता निवड समिती, बीसीसीआय तसेच अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावरच खरे काय ते स्पष्ट करण्याची वेळ आली आहे.
सूर्यकुमारने आता आणखी काय करायला हवे असे प्रश्न आता अनेक क्रिकेटपटू विचारत आहेत. अर्थात त्याचा निवड समितीवर काही परिणाम होईल ही शक्यताही नाही कारण यापूर्वीचे त्यांचे वर्तन भारतीय क्रिकेटप्रेमींनीही पाहिले व अनुभवले आहे. त्यात नवे काहीच नाही. ज्या खेळाडूने देशासाठी अफलातून कामगिरी केली, संघाच्या विजयात मोलाचे वाटे उचलले त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची जुनी सवय समितीला आहे. जे वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड या बड्या खेळाडूंच्या बाबतीत घडू शकते तर सूर्यकुमारच्या बाबतीत वेगळे काय घडणार.
एक फलंदाज म्हणून सूर्यकुमार दर्जेदार तर आहेच पण उपयुक्त मध्यमगती गोलंदाज म्हणूनही त्याने सरस कामगिरी केलेली आहे. आजच्या घडीला प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये 5 हजारपेक्षाही जास्त धावा त्याने केल्या आहेत. तसेच त्याने रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचे नेतृत्वही केले आहे. माजी कसोटीपटू दीलीप वेंगसरकर यांच्याच तालमित तयार झालेला हा उमदा खेळाडू गेल्या दोन मोसमांपासून भारतीय संघात स्थान मिळेल या प्रतीक्षेत आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.
त्याने वयाची तीशी गाठली असली तरीही त्याची तंदुरुस्ती कमी झालेली नाही. चौकार व षटकारांची आतषबाजी करणारा हा आक्रमक फलंदाज एकेरी व दुहेरी धावाही अत्यंत वेगवान पद्धतीने काढतो. त्याच्या याच गुणवत्तेचे खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कौतुक केले होते. एकदिवसीय व टी-20 सामन्यांसाठी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाच्या विजयासाठी अथक प्रयत्न करण्याची क्षमता असलेल्या सूर्यकुमारकडे करण्यात आलेल्या कानाडोळ्यामुळे पुढील काळात कोणताही खेळाडू भारतीय संघात आपल्यालाही स्थान मिळेल याची खात्री देऊ शकणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड करताना निवड समितीने इतकी घाई का केली असाही प्रश्न निर्माण होत आहे. रोहित दुखापतीतून तंदुरुस्त होण्याचीही वाट पाहिली जात नाही व लोकेश राहुलला थेट उप कर्णधारही बनवले जाते. दुसरीकडे सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या सूर्यकुमारकडे दुर्लक्ष केले जाते ही कशाची लक्षणे आहेत.
ज्या हिटमॅन रोहित शर्माने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले त्यालाच जर संघात स्थान मिळत नसेल तर इतरांची काय कथा. त्याच्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने म्हटले आहे तर, दुसरीकडे रोहित मुंबई संघासह सराव करताना दिसल्याने ही दुखापत खरी आहे का, या मागे काहीतरी षडयंत्र आहे अशीच आता शंका येत आहे. मुद्दाम मुंबईच्या खेळाडूंना बाजूला ठेवण्याचे तर कार्य सुरू नाही ना असाही प्रश्न पडलेला आहे.