– अमित डोंगरे
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाची जी भंबेरी उडाली ती पाहता जेव्हा जेव्हा परदेशात कसोटी सामन्यासाठी खेळपट्टीवर गवत राखले जाते तेव्हा भारताच्या सोकॉल्ड बलाढ्य फलंदाजीचा दर्जा नक्की कसा आहे हे समजते. पहिल्या डावात लोकेश राहूल तर दुसर्या डावात विराट कोहली वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारतात परदेशी संघांना बोलवायचे, खेळपट्टीवरील गवत काढून पाटा विकेट तयार करायची व फिरकी गोलंदाजांच्या जीवावर बळी मिळवायचे आणि फलंदाजीत मोठे मोठे विक्रम साकार करत आम्हीच कीती भारी हे दाखवणे आता तरी बीसीसीआयने थांबवावे. आपल्या गल्लीत सगळेच वाघ असतात असे म्हणतात ते काही खोटे नाही हेच या कसोटीने पुन्हा एकदा दाखवून दिले.
ज्या देशात कसोटी सामना असतो त्या देशाच्या संघाचा कर्णधार जसे सांगेल तशीच खेळपट्टी तयार केली जाते हे उघड आहे कारण आपल्याच देशातीलसामने तरी जिंकावेत हाच प्रत्येक कर्णधाराचा हेतू असतो. हे प्रत्येक देशाच्या बाबतीत घडते हे देखील मान्य परंतू स्पोर्टी ट्रॅक तयार केला तरच आपल्या संघाची ताकद व कमकुवत दुवे समजतात व त्यानूसार नेटमध्ये सराव करताना सुधारणेकडे लक्ष दिले जाते. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यापेक्षा ही गोष्टी आणखी कोण चांगली चांगू शकेल. मात्र, सध्या कडधान्ये महाग झाली असली तरीही ते मुग गुळून गप्प का बसले आहेत ते समजेनासे झाले आहे.
द्रविड यांच्याकडे जे तंत्र होते ते आताच्या भारतीय संघात कोणाकडेही नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यातही कोहलीचे पारडे काहीसे जड राहते कारण तंत्रतील उणिव तो जिद्दीच्या जोरावर भरून काढतो पण त्याच्या एकट्याच्या जीवावर कीती काळ अवलंबून राहणार मग सेकंंड बेंच पर्यटनासाठी गेऊन गेलो आहोत का. जसप्रीत बुमराहनेच विकेट काढायच्या, कोहलीनेच धावा करायच्या त्याला अपवाद म्हणून राहुलने एखादी खेळी करायची या कामगिरीवर कसोटी सामना जिंकता येत नाही. पहिल्या डावात २४५ धावा करणारा भारतीय संघ दुसर्या डावात १६३ धावांची पिछाडीही भरून काडू शकत नाही यापेक्षा मोठी नामुष्की कोणती असेल. लाल किंवा पोएटा मातीवरील खेळपट्टीवर पोसल्या जात असलेल्या आपल्या भक्कम फलंदाजीची लक्तरे सेंच्युरीयनच्या वेशीवर टांगली गेली आहेत आता तरी यातून काही बोध घेता आला आला तरच दुसरी कसोटी समाधानकारक निकाल देणारी ठरेल व किमान मालिका वाचवता तरी येइल.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ख्याती असलेल्या बीसीसीआयच्या थिंक टॅंकने याचा विचार करावा व भारतातही स्पोर्टी ट्रॅक तयार करावेत. पूर्वी आपल्याकडे कपिल देव वगळता कोणावर विश्वास ठेवावा असा वेगवान गोलंदाज नव्हता. आज ती परिस्थिती नाही. सध्या आपल्याकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा असताना पाटा खेळपट्ट्या तयार केल्या जातात याचेच आश्चर्य वाटते. जसे परदेशी संघ भारतीय संघ खेळणार असेल ग्रीन टॉप ठेवतात व आपल्या फलंदाजीची वाताहत करतात तेच आपणही करु शकतो केवळ बदल खेळपट्टीत नव्हे तर मानसिकतेतही होणे गरजेचे आहे. ग्रीन टॉप, डावखुरा वेगवान गोलंदाज व चेंडूला मिळणारा स्विंग याची अलर्जी आणखी कीती काळ आपल्या संघाला भोवणार आहे. हे टाळायचे असेल तर छाती ठोकून आमच्याकडे सक्षम सेकंड बेंच आहे हे सांगणे बंद करा व गांभीर्याने नेटमध्ये घाम गाळा, तंत्रावर भर द्या तरच कसोटीत निभाव लागेल.
————–