– अमित डोंगरे
संजू सॅमसननने गुरुवारी कोलकाता विरुद्धच्या सामन्यात जे काही केले त्याला केवळ आणि केवळ स्वार्थ असेच म्हणतात. त्याच्या जागी जर महेंद्रसिंह धोनी किंवा सौरव गांगुली हे राजस्थानचे कर्णधार असते तर त्यांनी एकेरी धाव काढून जयस्वालला जास्त चेंडू खेळायला दिले असते की जेणेकरून त्याचे शतक पूर्ण व्हावे. सॅमसनने आपल्या अर्धशतकासाठी जयस्वालच्या शतकाचा बळी द्यायचे ठरवले. शिक्षा नियतीने सॅमसनलाही दिली, तो देखील 48 धावांवर नाबाद राहिला व अर्धशतक पूर्ण करू शकला नाही.
यशस्वी जयस्वाल अफलातून फलंदाजी करत होता. त्याने 13 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला व त्याच आवेशात तो शतकाकडे कूच करत होता. मात्र, त्याचवेळी सॅमसननेही वादळी फलंदाजी सुरू केली. परिणामी जयस्वालला स्ट्राईक कमी मिळाली व त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. तो 98 धावांवर नाबाद राहिला. सॅमसन जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा जयस्वाल मॅसिव्ह टचमध्ये होता. त्याने मारलेलेच नव्हे तर त्याचे टायमिंग चुकलेले फटकेही चौकार व षटकारामध्ये परावर्तित होत होते.
खेळाडूचे हे असे नशीब फारवेळा दिसत नाही. त्यावेळी 11 वे षटक सुरू होते व सॅमसनला आक्रमक फलंदाजी करण्याची गरजच नव्हती. त्याने केवळ एकेरी धावा घेत जयस्वालला जास्तीत जास्त चेंडू खेळायला कसे मिळतील हे पाहणे महत्त्वाचे होते. मात्र, त्याने आपल्या स्वार्थ इथेच सिद्ध केला. 2 चौकार व 5 षटकार फटकावताना त्याने विजयासाठी आवश्यक धावांचे गणित असे आणून ठेवले की त्यानंतर जयस्वालला स्ट्राईक मिळूनही त्याला शतकापासून अवघ्या 2 धावांनी वंचित राहावे लागले.
सॅमसन राजस्थानचा कर्णधार आहे, त्याने संघहित पाहिले पाहिजेच यात दुमत नाहीच; परंतु आपल्या संघातील सर्वात भरात असलेला फलंदाज विक्रमी शतकाच्या उंबरठ्यावर आहे तर आपले कर्तव्य आहे की त्याला ती संधी मिळू द्यायची. म्हणूनच कदाचित सॅमसन चांगला कर्णधार ठरत नाही, निस्वार्थी खेळाडू ठरत नाही आणि म्हणूनच त्यालाही कितीही सरस कामगिरी केली तरीही भारतीय संघात स्थानही मिळत नाही. वयाच्या 21 व्या वर्षी जयस्वाल जी खेळी खेळून गेला त्याचे शतकात रूपांतर करणे सॅमसनला सहज शक्य होते, पण टीममॅन बनण्याची त्याची कुवत तर नाहीच परंतु इच्छाही दिसत नाही. असे खेळाडू कामगिरीने मोठे होत असतील पण नावाने नव्हे.