– शिवाजी राऊत
भाषा, साहित्य आणि भांडवलशाही यांच्या संबंधाचा एक धागा जोडण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. तो पुरेसा ठरेल, असे वाटते.
भाषा हा समकाल असतो आणि समकाल हे साहित्य असते. भाषा हा जैविक वर्तन प्रकार आहे. मुद्रित भाषा हा प्रभूसत्तावादी वर्तन प्रकार आहे. भाषिक जैविकता ही मौखिक परंपरा असते ते शतकांचे भाषेचे नेनिव संस्कार असतात. त्यामुळे भाषा आणि साहित्य यांचा ज्या ज्या अंगाने विचार केला जातो त्यामध्ये भाषा व साहित्याचा अन्य संबंध प्रस्थापित होत राहतोच. त्याहून तो समकालाच्या परिणामाचा व्यापक परिणाम घडवत असतो तो भाषेवर आणि साहित्यावर होत राहतो. म्हणून समकालीन भांडवलशाही आणि भाषा व साहित्य यांचा विचार करताना समकाल कोणता? भांडवलशाहीचे स्वरूप कोणते? समकालाची भांडवलशाही म्हणजे कालची, आजची आणि उद्याची हे कोणते भेद अपेक्षित आहेत? समकालीन विचार करताना भांडवलशाहीच्या इतिहासाला कोणत्या टप्प्यापर्यंत विचारात घ्यावयाचे आहे? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांशिवाय या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करता येणार नाही.
भाषेच्या घसरणीमध्ये अनेक शब्दांचा गोंधळ असाच चालू राहतो. समकाल हा असा एक शब्द आहे की याचा आरंभ आणि निश्चित टोक निश्चित नाही. असा हा समकालाचा कालखंड कोणता, 1990 नंतरचा का जगातील साम्यवादी राष्ट्रांमध्ये जी जी राज्य प्रणाली तयार झाली त्या कालखंडापासून समकालाचा विचार करायचा, हे यामध्ये निश्चित होत नाही. आशिया खंडातील स्वतंत्र राष्ट्रे आणि त्यांचे स्वातंत्र्य उत्तर कालखंड हे पाऊणशे वर्षाचे आहे. त्यामुळे समकालाला आधुनिकतेचाच पाया गृहीत धरून पुढे जावे लागेल. स्वातंत्र्य उत्तर कालखंड आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंड यांच्या सीमा रेषा गृहीत धरता येणार नाहीत आणि म्हणूनच समकालीन भांडवलशाही हिच्या अंतरंग समजावून घेताना त्या त्या राष्ट्राचा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, त्या त्या राष्ट्रातील सरंजामी राज्यव्यवस्थांचे अत्याचारी, निर्मळ स्वरूप, तिथला प्रभुत्व वादी उच्च जातीय वर्ग आणि त्यांच्या कृपा कटाक्षातून निर्माण झालेल्या शिक्षण, सार्वजनिक सेवा, उद्योग यामधील सुविधा आणि त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यानंतर रचलेल्या राष्ट्रीय पायानुसार वेग घेतलेली आधुनिकता याचाही विचार करावा लागेल. आधुनिक उत्तर कालखंड हा विकसित राष्ट्रांचा ठरवणे हीसुद्धा एक अनिश्चित गोष्ट आहे. कालखंडाचे टप्पे हे राज्यव्यवस्थेच्या बदलत्या विचारसरणीनुसार ठरवावयाचे की काय? याचाही विचार झाला पाहिजे.
2023 च्या मे महिन्यात भांडवलशाहीचा समकाल ठरवताना मागील तीन दशकांचा विचार करणे होय. जागतिकीकरण आले, जागतिक व्यापार संघटनेचे मुक्त धोरण जगात अनेक राष्ट्रांनी स्वीकारले. भांडवलाचे स्थलांतर सुरू झाले आणि बांडगुळी भांडवल व्यवस्था ही त्याच्या राज्यव्यवस्थांना शिकवून सशक्त होऊ लागली. भांडवलशाहीचे लाभ राज्यकर्त्यांना मिळू लागले. मध्यमवर्गाला आधुनिकता खुणावू लागली. भांडवलशाहीचे समर्थन विकासासाठी करणे हा उद्योग सुरू झाला. समकालीन भांडवलशाहीचा पाळणा हलवणारे अभिजनवादी आणि धर्मांध शक्ती या जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा राज्यव्यवस्था घटना घटनात्मक मूल्य नागरिकांचे अधिकार या सर्वच समाज सभ्यतेच्या भाषेमध्ये बदल होत गेला. म्हणूनच समकालीन भांडवलशाहीतील भाषा आणि साहित्य यांचा विचार अनेक पद्धतीने करण्याची गरज आहे. समकालीन भांडवलशाही ही मूलतत्त्ववाद व आंतरराष्ट्रीय कार्पोरेट इम्प्रॅलिझम यांचा पेहराव करून जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये वावरत आहे. ती प्रभुत्व गाजवत आहे. ती निर्मळ शोषण करीत आहे. त्यामुळे समकालीन भांडवलशाहीमध्ये मनुष्याचा श्रम शोषणाचा निव्वळ वापर हा अत्यंत मूल्यविहीन झाला आहे. तो श्रम वापरानंतर स्वच्छतेच्या स्वरूपामध्ये रूपांतरित झाला आहे. समकालीन भांडवलशाही ही आर्थिक विकासाच्या निरक्षरतेचा प्रदेश जनसामान्यांमध्ये वाढवत असते आणि जनतेची गंगाजळी असंख्य प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आहे ती अप्रत्यक्ष खासगीकरणाचे नवे नवे पर्याय राज्यकर्त्या वर्गाच्या हातात देऊन त्यांना खासगीकरण करायला भाग पाडते.
समकालीन भांडवलशाही ही समतेची शांतीसद्भावाची भाषा बोलत राहून ती समाज जीवनामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम पुढे येऊन करत नाही की, अति श्रीमंत वर्ग व अति गरीब अशा दोन वर्गांच्या निर्माण कार्यामध्ये मश्गुल असते. त्यामुळे समकालीन भांडवलशाही तंत्रज्ञान, धर्म, अस्मिता, राष्ट्रभक्ती यांचे पण पाढे स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत वधवून घेते. भांडवलशाही ही भाषा प्रमाण भाषा बनवते. आजचा विचार करा, आजचे जगा, उद्याच्या पिढ्यांचा विचार करू नका, निसर्गाचा विचार करू नका, जगण्याच्या संघर्षाची लढाई स्वतःपुरती जिंका, यासारखा स्वयंकेंद्रित स्वार्थ प्रेरित व्यक्तिवादी विचार, संकुचित विचार, समाजविरोधी विचार हा समकालीन भांडवलशाहीच्या साहित्य व्यवहारातून मानला जातो. हेच समकालीन भांडवलशाहीचे साहित्य ठरू शकते.
समकालीन भांडवलशाही ही प्रायोजित स्वरूपात अप्रत्यक्ष समाजात वर्तन करते. लेखक प्रायोजित करते. विषय प्रयोजित करते. कोणत्या जाती, धर्म, गटांचा विषय प्रमुख चर्चेचा बनवावयाचा याचे कथानक रचते. हे समकालीन भांडवलशाहीचे फार मोठे साहित्य व्यवहारातील नियंत्रण व व्यवस्थापन स्वरूप पुढे येते आहे. आजही समकालीन भांडवलशाहीतील भाषेचे हे भिन्न भिन्न गुण, तिच्या भूमिका सामान्य नागरिकांना, भाषिकांना कळत नाहीत. त्या तपासल्या जात नाहीत. त्याचे भाषा विश्लेषण आणि भाषा राजकारण स्पष्टीकरण स्वरूपात पुढे मांडले जात नाही. अजूनही भारतात भाषेचे राजकारण आणि साहित्याचे राजकारण याची साक्षरता पोहोचलेली नाही. समकालीन भांडवलशाहीच्या चिकित्सा आणि विश्लेषणात वर्तमानाच्या संघर्ष भूमिका, भाषा संवर्धनाच्या भूमिका, साहित्य नवनिर्माणाच्या पर्यायी भूमिका याचा विचार व्हायला हवा. यावर चिकित्सा व्हायला हवी. यावर संकल्प सोडायला हवेत तरच समकालीन भांडवलशाही भाषा व साहित्य यांचे विश्लेषण समजावून घेणे याला महत्त्व ठरते. किंबहुना त्याची सार्थकता यानंतर हाती येऊ शकते, असे वाटल्याने वरील निरीक्षणे नोंदवली आहेत. ही निरीक्षणे साहित्य वाङ्मय व्यवहार, भाषा व्यवहाराचे राजकारण आणि शोषण साहित्यातील शोषण आणि भाषेचे शोषण या अंगाने अद्याप सूक्ष्मपणे मांडण्याची गरज आहे.