विठ्ठल वळसे पाटील
मानव सेवा हीच ईश्वर सेवा असून दिनदुबळ्या वर्गाशी सार्वभौम वागणुकीतून मानवजात सुखी होईल, हे विचारधन स्वीकारून महात्मा फुले यांनी शोषित, वंचित, शेतकरी, बहुजन व महिला वर्गाच्या उत्थानासाठी शिक्षणाची दारे खुली करून शिक्षणाची गंगा वाहती केली. त्यांची आज जयंती त्यानिमित्त…
1818 नंतर संपूर्ण हिंदुस्थानावर ब्रिटिश सत्तेचा अंमल सुरू झाला. देशात ब्रिटिश सत्तेने वेगवेगळी धोरणे, सुधारणांचा अवलंब केला होता. त्या काळी भारतीय समाजात प्रचंड मागासलेपणा, अंधश्रद्धा व अज्ञानाने भरलेला होता. समाजात वर्णभेद, जातीवाद अस्तित्वात होता. त्यामुळे मागास, दलित, वंचित, बहुजन वर्ग व स्त्री वर्गाचे प्रचंड शोषण व दुय्यम स्थान होते. यामुळे बहुजन वर्ग पिचला जात होता. त्यात धार्मिक पगडा मोठा होता. देव आणि भक्त यात मध्यस्थीची आवश्यकता नाही. त्याचे अस्तित्व सर्वत्र आहे. अंधःकार दूर करायचा असेल, पाश्चात्य देशांबरोबर प्रगती साधायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखलेले युगपुरुष म्हणजे जोतिबा गोविंदराव फुले होय.
फुले यांनी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर कडाडून टीका केली. खालच्या स्थराकडून वरच्या स्थराकडे शिक्षणाची गंगा जावी. अर्थात आधी उपेक्षित मग अपेक्षित वर्गाला शिक्षण मिळाले पाहिजे, यावर भर देण्यासाठी त्यांनी शैक्षणिक विचार मांडले. यात स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा व्हावा, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, प्रशिक्षित शिक्षकांची सोय करावी, प्राथमिक शिक्षणावर लक्ष द्यावे, ग्रामीण भागातील मुलामुलींचे शिक्षण, राष्ट्रनिर्मिती कार्यासाठी शुद्रांना शिक्षण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण, त्रिभाषा सूत्र, शिष्यवृत्ती व वसतिगृह सोय, शिक्षण विषयक ज्ञान व विचार वाढवावेत, असे शिक्षण धोरण आखून त्यांनी सरकार समोर मांडले.
पूर्वीच्या काळी स्त्रीने शिक्षण घेणे अधर्म मानले जात होते. स्रियांना कोणतेच स्वातंत्र्य नव्हते, तिचे दासी स्वरूपच होते. तिला सक्षम बनाविण्यासाठी जानेवारी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेत भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध झाला. या शाळेच्या पाहिल्या शिक्षिका म्हणून धर्मपत्नी सावित्रीबाईंची नेमणूक केली. शाळा उभी करण्याआधी त्यांनी सावित्रीबाई यांना शिक्षणाचे धडे दिले. पहिल्याच दिवशी 8 मुलींचा प्रवेश झाला. पाहता पाहता मुलींची संख्या वाढली. तसे अडचणीला मदतीचे हातही लाभले. हे कार्य करताना शेण दगडाचा माराही सावित्रीबाईंना सहन करावा लागला. हळूहळू मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व लोकांना समजू लागले. पुढे सप्टेंबर 1851 साली रास्ता पेठेत दुसरी मुलींची शाळा उभी राहिली. शिकलेल्या लोकांसाठी 1852 साली पूना लायब्ररी स्थापन केली. वेताळपेठेत अस्पृश्यांची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकावर टाच आल्याने सावित्रीबाईंना येथेही शिक्षकेचा भार घ्यावा लागला. शाळा खर्च व कुटुबांचा भार उचलण्यासाठी 1854 साली स्कॉटीश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी केली, परंतु शिक्षणकार्यात खंड पडू दिला नाही.
1855 साली पुन्हा रात्रशाळेला आरंभ करून शिक्षणकार्य अविरत सुरू राहिले. ग्रामीण व शहरी भागांत 18 शाळा उभ्या राहिल्या. 1853 साली पुण्यात बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. बाळंतपण व अनाथ मुले सांभाळण्याचे व्यवस्थापन सावित्रीबाईंनी पाहिले. केशवपन थांबवण्यासाठी नाभिक लोकांचा संप घडवून आणला. बालविवाहावर बंदी आणली. 1856 साली विधवा पुनर्विवाह कायदा समंत झाला आणि 1860 साली विधवा पुनर्विवाह घडून आणला. 1868 साली पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी त्यांनी खुला केला. 1880 साली दारू दुकाने सुरू करण्यास विरोध केला. “शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ लिहून शेतकरी दुर्दशा मांडली. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करणारे, सामाजिक शिक्षण देणारे ते क्रांतिकारक ठरले.
24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1875 साली अहमदनगर येथे खतफोडीचे बंड करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 1887 सालच्या दुष्काळ विषयक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार समोर पत्रक मांडले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईच्या 1888 सालच्या सभेत जनतेने “महात्मा’ पदवी देऊन त्यांचा गौरव केला. वयाच्या 63 व्या वर्षी 28 नोहेंबर 1890 साली त्यांनी देह ठेवला. त्यांच्या पश्चातही सावित्रीबाईंनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी समाजातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा करणारे शिक्षण दिले. त्यांचे विचार क्रांतिकारी, परिवर्तनशील, विज्ञाननिष्ठ व बुद्धिप्रामाण्यवादी होते. म्हणूनच शिक्षणाचे महान कार्य या क्रांतिसूर्याच्या हातून घडले.