नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगिती प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे. त्यामुळे या सुनावणीतुन काय समोर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
आरक्षणाला स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आले होते. परंतु आजची सुनावणी ज्या खंडपीठाने स्थगिती दिली, त्याच नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होत आहे. प्रकरण एकदा मोठ्या खंडपीठाकडे गेलेले असताना ते पुन्हा तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे लागणं हे काहीसं आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया या प्रकरणाशी संबंधित काही वकिलांनी दिली.
आरक्षणावरची स्थगिती उठवणे हे सरकारसमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्याच खंडपीठापुढे हे प्रकरण लागल्याने सरकारची अडचण होईल का अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे सरकारची आज न्यायालयातली रणनीती काय असणार याची उत्सुकता होती.
सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. तसेच हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याचाही आदेश दिला होता. या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. त्यानंतर राज्यात या मुद्द्यावरुन राजकीय वादळ उठले. त्यानंतर ही स्थगिती उठवण्यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगिती उठवण्याबाबत आज काही निर्णय होतोय का? खंडपीठ यावर काय भूमिका घेतं? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.