सासवड – सध्या जगात थैमान घातलेल्या करोना व्हायरसचा परिणाम पुरंदर तालुक्यातील आर्थिक व्यवहारांवरही झाला आहे. गर्दीत मिसळल्याने करोनाचा संर्सगाची भीतीपोटी तालुक्यातील जेजुरी, भुलेश्वर, नारायणपूर, किल्ले पुरंदर परिसर, सासवडचे सोपानदेव मंदिर आदी विविध धार्मिक व पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यटन व्यवसाय कोलमडला आहे. रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.
चिकन खाल्ल्याने करोना होतो, या भीतीपोटी तालुक्यातील चिकनची मागणी घटली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे पाचावर धारण बसली आहे. 20 ते 30 रूपये प्रति नगाने बॉयलर कोंबडी विकूनही ग्राहक खरेदी करीत नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक डबघाईला आले आहेत. करोना व्हायरसच्या भीतीपोटी तालुक्यातील हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हॉटेल व्यवसाय थंडावले आहेत.
घरातून कामाशिवाय बाहेर पडणेच बंद केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. सासवड, जेजुरी, नीरा शहरातील बाजारपेठेत मंदीचे सावट पसरले आहे. अगोदरच नोटाबंदी व जीएसटीच्या धक्क्यातून व्यापारीवर्ग सावरला नाही. आता हे करोनाचे संकट समोर ठाकले आहे.
चीनमधून करोना व्हायरस आला असल्याने चायनीज पदार्थांची मागणीही घटली आहे. कांद्याची पात, कोबी, ढोबळी मिरचीची मागणी घटली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझर, मास्क यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यामुळे काळाबाजार वाढला आहे. किमतीपेक्षाही जादा रकमेने सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. 10 ते 20 रूपयांचे मास्क 200 ते 500 रूपयांपेक्षाही अधिक किमतीने विकले जात आहेत. यामध्ये प्रशासकीय यंत्रणेने लवकर मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करणे आवश्यक आहे.
पर्यटनस्थळावर कर्मचारी नियुक्त करा
सासवड, जेजुरी, नीरा शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पीएमपीएल स्थानक, पर्यटनस्थळे याठिकाणी स्थानिक प्रशासनाने देखरेखीसाठी कर्मचारी नियुक्ती करणे गरजेचे आहे. पुण्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्यामुळे करोना आता पुरंदर तालुक्याच्या उंबरठ्यावर दाखल झाला असुनही पुरंदर तालुक्यातील आरोग्य प्रशासनाने अलर्ट राहणे गरजेचे आहे. पुरंदर तालुक्यात एकही करोना मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आलेला नाही. पुरंदर तालुक्यातील बहुतांश नागरिक हे परेदशात नियमित ये- जा करतात. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होणे आवश्यक आहे.