एकूण रुग्णांपैकी तब्बल 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण स्मार्ट सिटीत
पुणे – राज्यात दिवसेंदिवस करोनाचा कहर वाढत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या महाराष्ट्रात करोनाने स्मार्ट सिटी असलेल्या शहरांवर थेट हल्ला चढविला आहे. राज्यात शनिवारपर्यंत आढळलेल्या एकूण 12,296 रुग्णांपैकी तब्बल 11,323 रुग्ण हे स्मार्ट सिटींमधील आहेत. हे प्रमाण 92.08 टक्के आहे. विशेष, म्हणजे देशातील स्मार्ट सिटीत दुसरे स्थान मिळविलेले पुणे हे करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यातील दहा शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश आहे. या मेट्रो शहरांमध्येच करोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या मुंबईत सर्वाधिक 8 हजार 359 करोनाबाधित आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुणे असून येथे 1 हजार 267 रुग्ण आहेत. या दोन शहरांमधील रुग्णांची संख्या ही राज्यातील एकूण रुग्णांपैकी 78 टक्क्यांच्या जवळ आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या ठाणे व नाशिकमध्ये अनुक्रमे 540 व 262 रुग्ण सापडले आहेत. या पाठोपाठ औरंगाबाद (220), नवी मुंबई (204), कल्याण-डोंबविली (195), नागपूर (146), सोलापूर (115) आणि अमरावती (31) या स्मार्ट सिटीचा समावेश आहे. तसेच केंद्र आणि राज्याने जाहीर केलेल्या रेड झोनमध्येही या शहरांचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्राकडून दरवर्षी स्मार्ट सिटीसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, या शहरांमध्येच करोनाने शिरकाव केलेला आहे. यामुळे या शहरांमधील मूलभूत सुविधांवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मृतांची संख्याही सर्वाधिक
राज्यातील या स्मार्ट सिटींमधील करोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदरही सर्वाधिक आहे. राज्यात आतापर्यंत 521 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात या स्मार्ट सिटींतील 475 मृतांचा समावेश आहे. हे प्रमाण 91 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.