मोरेह – भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह हे छोटेसे शहर म्हणजे मणिपूरमधील तेग्नोपाल जिल्ह्याचे मुख्यालय. मणिपूरचे व्यावसायिक केंद्र आणि दक्षिण-पूर्व आशियाचे प्रवेशद्वार अशीही या शहराची ओळख आहे. भविष्यात हे शहर आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र बनेल अशी चिन्हे आहेत. असे असले तरी सध्याची करोनाची साथ आणि म्यानमारमध्ये लष्कराने बंड करून सत्ता ताब्यात घेतल्याची घटना या दोन घटनांमुळे येथील व्यापार-व्यवसायासमोर धोका उभा ठाकला आहे.
हे शहर मणिपूरची राजधानी इम्फाळपासून 107 किलोमीटर अंतरावर आहे आणि म्यानमारसाठीचे ते शब्दशः प्रवेशद्वार आहे. कारण रोज अनेक भारतीय पासपोर्ट आणि व्हिसा नसताना इंडिया-म्यानमार फ्रेंडशिप गेट ओलांडून रोज टामू आणि नॅम्फलॉन्ग इथल्या बाजारात जात असतात.
अनेक वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून दोन्ही देशातील व्यापाराची नाळ जुळली आहे. परंतु, गेल्या 11 महिन्यांपासून जीवनवाहिनी ठरलेले हे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहे. मार्च 2020 मध्ये करोनाची लागण झाल्यानंतर सीमा बंद करण्यात आली. 1 फेब्रुवारी 2021 रोजी जेव्हा दिल्लीत भारताच्या अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत होत्या तेव्हा म्यानमारमध्ये लष्कराने बंड करून सत्ता ताब्यात घेतली. आता हे प्रवेशद्वार लवकर उघडले जाण्याची शक्यता धूसर झाली आहे.
मोरेह हे छोटेखानी शहर विविध संस्कृतीच्या लोकांनी नटलेले आहे. इथे स्थानिक कुकी, मैतैस जातीचे नागरिक राहतात तसेच तमीळ, बिरारी, मारवाडी आणि नेपाळी देखील मोठ्या संख्येने आहेत. नवी दिल्ली आणि म्यानमारची राजधानी यंगूनमधील घडामोडींपासून हे लोक अऩेक मैल दूर आहेत.
मोरेह आणि म्यानमारमधील टामू इथल्या लोकांना असे वाटते, की आपले जीवन परस्परांवर अवलंबून आहे आणि कुठलेही कटकारस्थान आपला व्यापार-व्यवसाय दीर्घकाळ रोखून धरू शकणार नाही. मोरेहमध्ये राहणारे आणि तिथल्या तमीळ संगम या संघटनेचे पदाधिकारी असलेले थिल्ला खान म्हणतात, आमचा म्यानमारबरोबरील व्यापार कित्येक दशके चालू आहे.
अगदी 1962 ते 2011 या कालावधीत म्यानमार मध्ये लष्करी राजवट होती तेव्हाही व्यापार-उदीम चालू होता. म्यानमारमधील सध्याच्या बंडाचाही त्यावर परिणाम होणार नाही, अशी आशा आहे. आम्हांला एवढीच चिंता आहे की, सीमा किती काळ बंद राहणार. म्यानमारकडून पहिल्यांदा सांगण्यात आले होते की, 31 डिसेंबरला सीमा खुली करण्यात येणार आहे. नंतर 31 जानेवारीची तारीख देण्यात आली होती. आता यंगूनमधील परिस्थिती पाहता सीमा आणखी काही काळ बंद राहील असे दिसते. सुमारे तीन हजार तमीळ नागरिक या छोट्या शहारात राहतात. त्यांचा सीमेपलीकडून चालणाऱ्या व्यापारावर दीर्घकाळापासून प्रभाव आहे.
त्यावेळच्या ब्रह्मदेशातून 1948 आणि 1960 मधून ते निर्वासित म्हणून आले आहेत. बहुतेकजण 1962 मध्ये जेव्हा लष्कराने सत्ता ताब्यात घेतली तेव्हा आलेले आहेत. त्यांनी तमिळनाडूत स्थायिक होण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्याठिकाणी जुळवून घेता न आल्याने तमीळ चेट्टीयार नागरिकांनी पुन्हा ब्रह्मदेशाता जाण्याचे ठरवले. परंतु म्यानमाराच्या लष्कराने त्यांना सीमेवरील मोरेह येथेच रोखल्याने ते सीमेवरील या गावात स्थायिक झाले. त्यामुळे या गावात तमीळ शैलीतील मंदिरे, इडली-डोशाचे स्टॉल दिसतात.
मात्र सगळे तमीळ सरमिसळ भाषा बोलतात. त्यामध्ये कुकी, बर्मी, मैतैई, हिंदी, इंग्लिश अशा शब्दांची मिसळ असते. खान हे तमिळनाडूनतील रामनाथपुरम जिल्ह्यातील आहेत. त्यांना म्यानमारमधून बाहेर घालवून देण्यात आल्यानंतर कुटुंबियांच्या इच्छेच्या विरोधात ते मोरेह गावात स्थलांतरित झाले. मोरेहमधून दोन्ही देशांदरम्यान चालणाऱ्या व्यापाराचा विचार केला तर बनियन, लुंगीपासून ते साड्या, अन्नपदार्थ, धान्य, दुधाची पावडर, औषधे असा असंख्य वस्तूंचा समावेश होतो. मोरेहच्या बाजारपेठेपासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर असणाऱ्या म्यानमारमधील नॅम्फलॉन्गमधील बाजारपेठेत या सगळ्या वस्तू विकल्या जातात.
तिथून पुढे त्या टामुतील बाजारात जातात. नॅम्फलॉन्गच्या बाजारपेठेत चीन आणि थायलंडमधून येणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर असतात. भारतीय व्यापारी तिथून अनेकदा कुकर, डास मारण्याच्या रॅकेट अशा वस्तू मोरेहमध्ये आणतात आणि तिथून मग त्या भारतातील इतर भागात पाठवल्या जातात. आता व्यापाऱ्यांना हा दोन्ही देशातील व्यापार पूर्ववत होईल असे वाटत असले तरी म्यानमारमध्ये जन्मलेले परंतु आता मोरेहमध्ये स्थायिक झालेले आणि मोरेह सीमा व्यापार चेंबर ऑफ कॉर्मसचे अध्यक्ष सुरिंदरसिंग पथेजा मात्र याबाबत साशंकता व्यक्त करतात.
ते म्हणतात, म्यानमारमध्ये लोकशाही राजवट होती तेव्हा 62 वस्तूंच्या व्यापारावर कोणताही कर नव्हता तर बाकीच्या वस्तूंवर सीमाशुल्क आकारण्यात येत होता. आता म्यानमारमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी टामूमध्ये निदर्शने झाल्याचे आम्ही ऐकून आहोत.