- मुंबई बेस्ट सेवेतील 14 चालक वाहक आगारात परत
पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारातून शिर्डी आणि पंढरपूर मार्गावर बस सुरु करण्यात आली आहे. करोनामुळे आगार प्रशासनाने काही मार्गावरील गाड्या कमी केल्या होत्या. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व मुंबईत बेस्ट सेवेत गेलेले चालक-वाहक परत आल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी ह्या मार्गावर बस सुरु करण्याचा निर्णय आगार प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
शिर्डी आणि पंढरपूर मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या मार्गावर बस सुरु करण्याची मागणी होत होती. याचा विचार करत वल्लभनगर आगार प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. आज पासून आगारातून शिर्डीसाठी दुपारी साडे चार आणि सायंकाळी साडे पाच वाजता बस सेवा सुरु करण्यात आली आहे. तर, पंढरपूरसाठी दुपारी अडीच आणि साडे तीन वाजता दोन बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.
वल्लभनगर आगारातील 7 चालक आणि 7 वाहक हे सुमारे सहा महिन्यांपासून मुंबईतील बेस्ट बसच्या सेवेसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, आता ते परत आगारात दाखल झाल्याने ह्या मार्गावर बससंख्या वाढवण्यात आली आहे. शिर्डी आणि पंढरपूरला जाणाऱ्या श्रद्धाळूंची संख्या मोठी आहे.
तसेच या मार्गांवर अनेक गावे आहेत. या गावी जाणाऱ्या नागरिकांची देखील या बसमुळे सोय होणार आहे. तरी, नागरिकांनी एसटीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी केले आहे.