औरंगाबाद: औरंगाबादमध्ये करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच चालाल आहे. शहरातील पाच भागात २३ नवे करोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. २३ नव्या रूग्णांसह शहरातील करोनाबाधितांची संख्या २३९ वर पोहचली आहे. शनिवारी सकाळी २३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये नूर कॉलनी पाच, बायजीपुरा ११, कैलाशनगर तीन, समतानगर दोन, जयभीमनगर येथील दोन रूग्णांचा समावेश असल्याचे डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
राज्यात काल दिवसभरात ३९ रूग्णांची वाढ झाली होती. आज शनिवारी त्यात २३ जणांची भर पडली. शुक्रवारपर्यंत औरंगाबादमघ्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील चिकलठाणा भागात व मसनतपूर भागातील दोघेही जिल्हा रुग्णालयात काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता करोनाची बाधा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही झाल्याचे पुढे आले आहे.
भवानीनगर वॉर्डातील दत्तनगरमधील वाहनचालकासही करोनाची लागण झाल्याने या सर्वाच्या संपर्कातील ७० जणांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती कोविड कार्यबल गटाच्या प्रमुख अॅड. अपर्णा थिटे यांनी दिली. परभणी येथून गारखेडा भागात आलेल्या व्यक्तीस शोधण्याचा दूरध्वनी परभणी प्रशासनाकडून आल्यानंतर इंदिरानगर भागात तिचा शोध घेण्यात आला. मात्र, तिचा शोध लागला नाही. मात्र, तिच्या संपर्कातील पाच जणांचेही विलगीकरण करण्यात आले.