नवी दिल्ली – महाराष्ट्र आणि पंजाबमधील वाढणारी करोना बाधितांची संख्या हा तीव्र चिंतेचा विषय आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या दोन राज्यांमध्ये बाधितांची संख्या खुप जास्त असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी नमूद केले आहे. मंगळवारी महराष्ट्रात 26 हजार 600 बाधित सापडले. तर पंजाबात ही संख्या दोन हजार 254 होती. एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण 65 टक्के होते.
दोन्ही राज्यात खूप चिंताजनक स्थिती आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 28 हजारांपेक्षा अधिक बाधित नोंदवले गेले आहेत. पंजाबमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात बाधितांची संख्या खूप जास्त आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दैनंदिन वार्तालापात सांगितले. गुजरात आणि मध्यप्रदेशातही चिंताजनक परिस्थिती असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.
गुजरातमधील बहुतांश बाधित हे सुरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगर येथे केंद्रीत झाले आहेत. तर मध्य प्रदेशात ही वाढ प्रामुख्याने भोपाळ, इंदूर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूल या शहरात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
देशांत सर्वाधिक बाधित असणाऱ्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बंगळूरू शहर, नांदेड, जळगाव आणि अकोला अशी या जिल्ह्यांची नावे आहेत.
महाराष्ट्रातून आलेल्या नमुन्यांमध्ये डिसेंबर 2020च्या तुलनेत इ484 क्यू आणि एल 452 आर या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. 18 राज्यांत विषाणूंचे 771 प्रकार सापडले आहेत. तर करोनाच्या युके विषाणूंनी 736 जण बाधित आहेत. ही वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत.
ज्या राज्यात संवेदनशील लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे तेथे करोनाची वाढ होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अशी संवेदनशील लोकसंख्या अधिक असल्यास अीाण त्यांनी करोनाचे निर्बंध न पाळल्यास त्यांना संसर्ग होण्याची भीती अीधक असते. मग तो करोनाचा विषाणू असो अथवा साधा विषाणू, असे ते म्हणाले.
म्हणून सरसकट लसीकरण
करोनामुळे मृत्यू पावलेल्यांमध्ये 88 टक्के व्यक्ती या 45 वर्षांवरील वयोगटातील आहेत. या गटात करोनाचा मृत्यू दर 2.85 टक्के आहे. त्यामुळे या वर्गाला वाचवण्यासाठी या वर्गाचे सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय शास्त्रीय माहितीच्या आधारे घेण्यात आला, असेही राजेश भूषण यांनी स्पष्ट केले.