पुणे – करोनाने मृत पावलेल्यांच्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा निधी देण्यासाठी त्यांची माहिती गोळा करा, असे आदेश राज्याच्या “मदत आणि पुनर्वसन’ विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी मंगळवारी दिले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी संपूर्ण राज्यातील प्रमुखांची करोना, ओमायक्रॉन या सगळ्या पार्श्वभूमीवर उपाययोजना, तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक घेतली, त्यामध्ये वरील आदेश दिले आहेत.
या बैठकीला गुप्ता यांच्यासह डॉ. प्रदीप व्यास, रामास्वामी हे आरोग्यातील विविध विभागाचे सचिव आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
करोना प्रतिबंधक उपायोजना, सद्यस्थिती, ओमायक्रॉन या सर्व विषयांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा याबैठकीत घेण्यात आला. तसेच या बैठकीत करोनाने मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांच्या मदतीविषयी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले.
यामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रातील कोविडने मृत झालेल्यांची माहिती गोळा करणे, कागदपत्र पडताळणी करून त्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्याचे “आयसीएमआर’ पोर्टल बनवले आहे. त्यामध्ये ही माहिती भरणे आवश्यक आहे. त्यानंतर हा मदतनिधी संबंधितांपर्यंत पोहोचू शकणार आहे.
विलगीकरणाचा विषय गांभीर्याने घ्या…
हायरिस्क देशांमधून तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांच्या विलगीकरणाचा विषय गांभीर्याने घ्या – बैठकीत सूचना
करोना किंवा “ओमायक्रॉन’ यांची लागण परदेशातून आलेल्या नागरिकांमधूनच झाली आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांच्या विलगीकरणाचा विषय गांभीर्याने घ्या, असे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. ते आल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे, ती निगेटिव्ह असली तरी त्यांना गृहविलगीकरणात ठेवून दहाव्या दिवशी त्यांची पुन्हा टेस्ट करणे आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात या सूचना देण्यात आल्या आहेत.