वेल्हे – करोना या जागतिक माहामारीमुळे काही वाईट तर काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. वेल्हे तालुका कृषी प्रधान आहे. तालुक्यात 80 ते 90 टक्के शेती केली जात होती; परंतु अलीकडच्या फॅशन युगामुळे तालुक्यातील तरुण वर्गाने शेतीकडे पाठ फिरवली होती. शेती करणाऱ्यांच्या संख्येत घट होऊन काही शेतकऱ्यांनी एक एकरा ऐवजी अर्धा एकर शेती करू लागला होता.
पालक शेतात मदत करण्यास सांगूनही तरुण वर्ग शेतीकडे दुर्लक्ष करू लागला होता. शेतीत काय आहे एवढं? त्यापेक्षा माझं काम बरं हे तरूण मंडळींचं उत्तर असायचे. शेतात कष्ट नको की उन्हाचा चटका नको. त्यापेक्षा ऑफिसाचा एसी बरा म्हणणारी मंडळी आता शेतात राबताना दिसत आहेत. आपल्या आई-वडीलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मशागत करत आहेत. ऐरवी कपडे खराब होतील. कपड्यावरची इस्त्री उडेल म्हणणारी मंडळी कपड्यांना ठिगळे लावून शेतीत काम करीत आहेत. तीन तीन धरणाने वेढलेला वेल्हा औद्योगिकीकरणापासून चार हात लांबच राहिला आहे.
निवडणुका आल्या की राजकारण्यांचे राजकारण चालते. त्यामुळे विकासाला खीळ बसलेल्या तालुक्याला शेती हा एकमेव पर्याय बनला आहे. तालुक्यातील तरुण वर्ग पुणे येथील मार्केट यार्डला मोठ्या संख्येने काम करत आहेत. तर काही तरुण छोटे मोठे उद्योग धंदे पुणे- मुंबईत करत होते.
करोना भारतात आला आणि शासनाने लॉकडाऊन घोषित केले. हाताला काम नाही. त्यामुळे जगणं अवघड होऊन बसलं. जगावं कसं? तर मग गावाकडे जावं आणि ओस पडलेली शेतीला पुन्हा उभारी द्यावी म्हणून गावाकडे तरूण मंडळभ आले खरे, पण खायचे काय? हा प्रश्न भेडसावू लागला. पुढे भविष्यात अशी वेळ येऊ नये म्हणून आपली शेती कधीही बरी म्हणत हातात बैल नांगर घेऊन अन् ओस पडलेल्या शेतात न दिसलेला तरुण राबताना पाहायलास मिळत आहे.