औरंगाबाद – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट ठरला असून अद्यापही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या देशात सर्वाधिक आहे. राज्यातील काही प्रमुख महानगरे सध्या कोरोनाच्या रडारावर असून येथील स्थिती चिंताजनक ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, ‘डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईत करोनाची स्थिती चिंताजनक आहे.’ असं वक्तव्य केलं.
“देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं, वैद्यकीय सेवा वाढवणं या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. महाराष्ट्रात मुंबईपेक्षाही चिंताजानक स्थिती ही डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय. पावसाळ्याच्या दृष्टीने आणखी काळजी घेण्याची गरज आहे.” असं देखील पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार शरद पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी याआधी नाही व जळगावचाही दौरा केला.
मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी, ” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कामगिरी चांगली आहे. करोनाच्या संकटावर, रुग्णसंख्येवर ते व्यवस्थित लक्ष ठेवून आहेत. ऑगस्ट महिन्यात करोनाचा रेट वाढू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. ही बाब लक्षात घेऊन हा करोना रुग्णांचा रेट वाढू नये यासाठी प्रय़त्न सुरु आहेत.” असं मत व्यक्त केलं.