नवी दिल्ली – भारतात करोनाची पहिली लाट आल्यानंतर सूत्र या गणिती प्रारुपाचा वापर करून वैज्ञानिकांनी काही अंदाज बांधले होते. त्यानुसार ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या जास्त असेल. नंतर ती सप्टेंबरमध्ये अधिक असेल असा निष्कर्ष काढण्यात आला होता.
फेब्रुवारीमध्ये रुग्णसंख्या कमी राहील, असा अंदाज या गणिती प्रारुपानुसार काढण्यात आला होता. तो अंदाज जवळपास खरा ठरला आहे. आता कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक मणिंद्र अग्रवाल यांनी याच प्रारूपाच्या आधाराने पुन्हा एक अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार सध्याचे करोना संसर्गाचे प्रमाण एप्रिलपर्यंत शिखरावस्था गाठेल. एप्रिलच्या मध्यापर्यंत अर्थात 15 तारखेपर्यंत करोना रुग्णांची संख्या वाढत राहील.
त्यानंतर रूग्णांची संख्या कमी होण्यास अर्थात नव्याने बाधित सापडण्याचा वेग कमी होण्यास सुरूवता होईल. मे महिन्याच्या अखेरपर्यंत करोना रुग्ण कमी होतील, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.
तर स्वतंत्र गणिती आकडेमोडीनुसार, हरियाणाच्या अशोक विद्यापीठाचे गौतम मेनन यांनीही दुस-या लाटेची शिखरावस्था ही एप्रिलमध्ये आणि मे मध्य यांच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवला आहे.
मात्र हे केवळ गणितीय अंदाज आहेत. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सातत्याने केले जाते आहे.