करोना विरुद्धच्या लढाईत प्रशासनाचे सुयोग्य नियोजन ठरले “जीवनदायी’
पुणे – भारतात आणि विशेषत: पुण्यामध्ये जेव्हा 18व्या शतकात प्लेगची साथ आली; त्यावेळी डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली होती. किंबहुना त्याची स्थापनाच या रोगाच्या नियंत्रणासाठी करण्यात आली. याच रुग्णालयाने मागच्यावर्षी करोना प्रादुर्भावाच्या काळातही “सेनापती’ची भूमिका बजावली.
साथरोगांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणे सर्वाधिक गरजेचे असते. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या जिविताचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतो. हेच नेमके डॉ. नायडू रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्ही केले, त्यामुळेच कर्मचारी आणि रुग्ण यांच्याशी योग्य समन्वय साधता आल्याची आठवण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुधीर पाटसुते यांनी सांगितली.
आपल्याला करोना झाला आहे ही भीतीच प्रथम रुग्णाला अर्धमेले करून टाकते. परंतु, रुग्णांचे समुपदेशन, विलगीकरण आणि योग्य उपचारपद्धती यामुळे त्यांना बरे करणे सोपे झाले आणि अर्धी लढाई येथेच संपली. पुण्यातील करोनाच्या पहिल्या रुग्णापासून आतापर्यंत तब्बल 5 हजार 350 रुग्णांवर डॉ. नायडू रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. अचानक आलेले संकट, कुशल मनुष्यबळाचा अभाव, ऑक्सिजनची कमतरता, बेडचे नियोजन त्यातून राजकीय आणि अन्य दबाव या सगळ्या परिस्थितीतून हे रुग्णालय तावून-सुलाखून बाहेर पडले आहे.
करोना साथरोगाच्या सुरुवातीपासूनच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये पीपीई किट घालण्यापासून बाधित रुग्णांचे विलगीकरण, त्यांची शुश्रुषा, रुग्णांवरील उपचार, गंभीर रुग्णांची हाताळणी, गर्दीचे व्यवस्थापन, सॅनिटायझेशन अशा अनेक विषयांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर त्यांचे शिफ्ट, विलगीकरण, त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून घेतली जाणारी काळजी या सगळ्याचा त्यात समावेश होता.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे येणारा ताण कमी करण्यासाठी राज्यसरकारने “इमर्जन्सी’मध्ये डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय सहाय्यकांची भरती केली. डॉ. नायडू येथे लागणाऱ्या सर्व साहित्याचा पुरवठा करण्यात आला. अगदी लॉन्ड्री मशीन पासून ते ऑक्सिजन युनिटपर्यंत सर्व व्यवस्था “अपटूडेट’ करण्यात आली. रुग्णालयातील चार मजले वापरात आणून टप्प्याटप्प्याने खाटा वाढवण्यात आल्या. आयपीडीची उभारणी करण्यात आल्याची आठवणही डॉ. पाटसुते यांनी सांगितली.
“तो’ आनंदाचा क्षण…
पंतप्रधान नरेंद मोदी हे डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातील परिचारिकेशी बोलले तो क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण ठरला. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यामध्ये सापडला त्यामुळे पुणे लगेचच चर्चेत आले. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ज्यांच्याशी पंतप्रधान बोलले त्यात पुण्यातील डॉ. नायडू मधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पंतप्रधान प्रातिनिधिक स्वरूपात परिचारिकेशी बोलले असले तरी ते सर्वच कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणारे होते अशी आठवणही डॉ. सुधीर पाटसुते यांनी सांगितली.
ऑक्सिजनसाठी वणवण…
ऑक्सिजनची सेंट्रल लाइन नसल्याने सिलिंडर ने-आण करणे, चाकणला जाऊन सिलिंडर भरून आणणे, अशी सर्व कामे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना करावी लागत होती. ऑक्सिजन तुटवड्याच्या गंभीर समस्येला क्षणोक्षणी तोंड द्यावे लागत होते असे डॉ. सुधीर पाटसुते यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने याचाही प्रश्न सुटल्याचे त्यांनी नमूद केले.