पुणे – शहरात करोना प्रतिबंधात्मक नियम लागू केल्यानंतर होणारी अनावश्यक गर्दी रोखण्यात महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेस अपयश येत आहे. त्यामुळे शहरात करोना साथीचा वाढता प्रसार प्रशासकीय यंत्रणांच्या हाताबाहेर जाऊ लागल्याने, पुढील काही दिवसांत शहरातील निर्बंध आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्या (गुरुवारी) रोजी सकाळी 11 वाजता तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत हे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह तीनही अतिरिक्त आयुक्त तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
शहरात करोनाचे अवघ्या महिन्याभरात 15 हजारांपेक्षा अधिक बाधित सापडले आहेत. तर बुधवारी विक्रमी 2587 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली असून आज विक्रमी 11 हजार करोना चाचण्या झालेल्या आहेत.
परिणामी, पुढील दोन दिवसात हा आकडा 3 हजारांच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरात वेळीच निर्बंध न लावल्यास ही स्थिती हाताबाहेर जाण्याची भिती आहे. त्यामुळे तातडीने निर्बंध लावण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे त्याबाबत महापालिका स्तरावर उद्याच निर्णय घेणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले. तसेच शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची करोना आढावा बैठक असून त्यातही हे निर्बंध लावण्यासाठी मागणी केली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
पालिकेच्या इमारतींमध्ये नागरिकांना बंदी
दरम्यान, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन उद्यापासूनच (गुरुवार) महापालिकेच्या मुख्य इमारती तसेच शहरातील इतर कार्यालयांमध्ये अत्यावश्यक कामांसाठीच नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे, तसेच या पूर्वी प्रमाणे नागरिकांना आपल्या तक्रारी, तसेच इतर कामांसाठी ऑनलाईन संपर्काची व्यवस्था निर्माण करून दिली जाणार आहे. पालिकेतही मोठया प्रमाणात नागरिक गर्दी करत असल्याने अनेक अधिकारी तसेच कर्मचारी करोना बाधित होत असून त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याने आयुक्तांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
हे असू शकतात निर्बंध
– उद्याने दोन्ही वेळेस बंद
– पीएमपीमध्ये 50 टक्केच प्रवासी
– कार्यालयात 50 टक्केच
– कर्मचारी उपस्थिती
– महापालिकेच्या कार्यालयांमध्ये नागरिकांना बंदी
– मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट बंद करणे अथवा वेळ आणखी कमी करणे
– शहरात सायंकाळी सात ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी