दौंड – तालुक्यातील पाटस गावातील तीन सख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अवघ्या आठ दिवसांत या तिन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागातही करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटस येथे आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. गावात 21 जणांना लागण झाली होती. यातील एका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा (दि.19) मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच कुटुंबातील आणखी चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. तीन सख्ख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या आठ दिवसांत तिघांना मृत्यूने कवटाळले.
सध्या ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची पाच आहे. 16 आशा सेविकांच्या माध्यमातून गावात, वाड्या-वस्त्यांवर सर्व्हे सुरू आहे. ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे.