मुंबई – राज्यात “म्युकरमायकोसिस’ आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्वतंत्र पथक करावे, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. जालना येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी याबाबत सांगितले.
“म्युकरमायकोसिस’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. करोनापाठोपाठ हे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. मात्र, त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात त्याठिकाणी “म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. तेथे स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचाराची स्वतंत्र पथकदेखील नेमावे, अशा सूचना केल्याचे टोपे यांनी सांगितले.
या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेली 5000 इंजेक्शन आज प्राप्त झाली असून त्याचे वितरण करण्यात आले आहे. हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. अंगावर दुखणे काढण्याचे आणि उशिरा उपचारासाठी दाखल होण्याच्या प्रमाणामुळे राज्याचा मृत्यूदर जास्त आहे.
त्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे रुग्ण गेल्यास त्यांनी लक्षण दिसताच आधी चाचणी करावी आणि त्यानंतर उपचार करावेत, अशा सूचना सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आरोग्य यंत्रणेमार्फत दिल्याचेही टोपे यांनी सांगितले