शंकर दुपारगुडे/कोपरगाव: जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे तो संसर्गजन्य विषाणू असल्याने त्याची लागण भारतात हि झाली. देशात हळूहळू पसरत असलेल्या कोरोनाने सर्वांची झोप उडवली आहे. त्याची लागण होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर गर्दीच्या सर्वच ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश केले. कोरोनाच्या चिंतेने ग्रासलेले नागरिक घराबाहेर जाण्यास टाळत असल्याने बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत असून त्यातून आर्थिक उलाढाल मंदावली आहे. सर्वाधिक फटका एस टी महामंडळाला बसत आहे.
कोपरगाव बस आगाराच्या पन्नास टक्के गाड्यांचे चाक कोरोनाच्या भीतीने रुतले आहे.ग्रामीण भागासह शहरीभागात ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी आपला प्रवास टाळला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बस आगाराने प्रवाश्याअभावी बंद ठेवल्या आहेत. त्याचा थेट फटका आगाराच्या तिजोरीला बसत असून एका दिवसाला पाच लाखापेक्षा जास्त रुपयांचे नुकसान आगाराला सहन करावे लागत आहे.
त्यात भर म्हणून शहरतील शाळा, महाविद्यालय ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्याने एस टी महामंडळाला अधिक आर्थिक नुकसान होणार आहे. ज्या बस रस्त्यावर धावत आहेत त्यात हि प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली आहे. नेहमी गर्दीने फुललेली बाजारपेठ कोरोनाच्या धसक्याने व ग्राहकांची संख्या रोडावल्याने ओस पडली आहे. त्यातून बाजारपेठेची आर्थिक उलाढाल मंदावली आहे.
व्यापारी वर्गात व छोट्या दुकांदारांपुढे वस्तूंच्या विक्रीचा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्यूस, आईसक्रीमची दुकाने थाटली होती. मात्र सध्या वातावरनात देखील बदल होत असून कधी थंडी तर कधी ऊन असे जाणवत असल्याने त्यांच्या हि ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. तालुक्यात कोरोनाचा एकही संशियीत रुग्ण नसताना लोकांनी मात्र त्या विषाणूची धास्ती घेतली आहे.
गर्दीच्या ठिकाणी न जाणे ,एकमेकांच्या गाठीभेटी न घेणे, हस्तांदोलन टाळणे आदि गोष्टीत नागरिक सतर्क आहे व शासनाला देखील सहकार्य करीत आहे. उद्याचा आठवडे बाजाराबाबत तर्क वितर्क लढवले जात असताना देखील शहरातील काही शाळाना शिक्षण विभागामार्फत शाळा बंद ठेवण्याचे रीतसर आदेश प्राप्त न झाल्याने पालक विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.