पिंपळे गुरव – करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश, राज्य व स्थानिक प्रशासन रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनदेखील प्रयत्न करत आहे.
देश करोनास प्रतिबंध करण्यासाठी लस संशोधन करत आहे. अनेक देशांच्या लॅब या संशोधनासाठी प्रयत्न करत आहेत. ती लस तयार केल्यानंतर प्रथमतः प्राण्यांवर प्रयोग केला जातो. नंतर माणसांवर तिचा प्रयोग करून लस निर्माण केली जाते. परंतु लस टेस्टिंग करण्यासाठी माणसे पुढे येत नाहीत. पण सांगवी येथील एक तरुण करोना लस टेस्टिंगसाठी जिवावर उदार होऊन पुढे आला आहे. त्यामुळे त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
संपूर्ण विश्व कमीजास्त प्रमाणात आज लॉकडाऊन झाले आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अर्थकारण शिथिल झाले आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या हाती काम राहिले नाही. सर्वसामान्य जनता अन्नाच्या शोधात फिरत आहे. परंतु अशा परिस्थितीतही करोनावर एक दिवस लस निर्माण होईल आणि संपूर्ण विश्वाला ज्या करोनाने वेठीस धरले आहे त्याचा नायनाट होईल, अशी अशा सर्वांनाच आहे.
जगात बऱ्याच औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या करोनावर लस निर्माण करण्यासाठी संशोधन करत आहेत. काहींनी लस निर्माण करून त्याचे टेस्टिंगदेखील सुरू केले आहे. ते टेस्टिंग करण्यासाठी प्रथम प्राण्यांवर प्रयोग केला जातो. त्यांच्यावर काय परिणाम होत आहे. लस दिल्यानंतर काय लक्षणे दिसून येत आहेत. त्यांच्या जिविताला धोका निर्माण होत नाही ना याची खात्री करून नंतर त्या लसीचा प्रयोग माणसांवर केला जातो. परंतु असा प्रयोग काही वेळेस त्या माणसांच्या जिवावरदेखील बेतू शकतो. त्यामुळे अशा गोष्टीसाठी सहसा माणसे तयार होत नाहीत. परंतु लस डेव्हलप होणे गरजेचे आहे. त्यामुळे माणसावर लस टेस्टिंग करण्यासाठी सांगवी येथील एक तरुण स्वतः तयार झाला आहे. तसे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना ट्विटद्वारे कळविले आहे.
कोणत्याही अटी-शर्थींशिवाय तयार
सांगवी येथील शशिकांत महादेव नागणे या चाळीस वर्षीय तरुणाने स्वतः करोना लसच्या टेस्टिंगसाठी बिना शर्त आपण तयार असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या घरात देशसेवेचा वसा आहे. माझे वडील मिलिट्रीत होते. सध्या देश अडचणीत आहे. करोनाच्या रूपाने मोठी महामारी आली आहे. त्यामुळे करोनावर लस निर्माण होत असेल आणि तिच्या टेस्टिंगसाठी माणसाची गरज असेल तर मी कोणत्याही अटीशर्थीशिवाय तयार आहे. असे जर घडले तर माझ्या हातून एक मोठी देशसेवा घडेल. यात मृत्यू आला तरी त्याला मी स्वतः सर्वस्वी जबाबदार असेल, अशी भावना त्यांनी या वेळी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.