नागपूर – राज्यावर एकीकडे करोनाचे संकट गडद होत असताना मार्चमध्येच पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचले होते. अशावेळी आता नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात 3 दिवस मॉडरेट हिट व्हेवचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मराठवाडाच्या काही जिल्ह्यांमध्येही पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. कोकणातही तापमान वाढ नोंदवण्यात आली आहे. रत्नागिरीचे तापमानही 40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. तिकडे नागपूरसह विदर्भात तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. आज आणि उद्या राज्यात पुन्हा तापमान वाढीची शक्यता नोंदवण्यात आली आहे. विदर्भ आणि विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यातील काही भागात तापमान वाढीचा अंदाज हवामान खात्याकडून नोंदवण्यात आला आहे. काही शहरातील तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशातही तापमान वाढ नोंदवण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल दिल्लीत 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. होळी दिवशी म्हणजे 29 मार्चला 1976 चे रेकॉर्डही तुटल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर दुसरीकडे 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान पूर्वोत्तर राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
29 तारखेला राज्यातील तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
अकोला – 42.8
अमरावती – 41.8
बुलडाणा – 40
ब्रम्हपुरी – 43.3
चंद्रपूर – 42.8
गडचिरोली – 38
गोंदिया – 40.8
नागपूर – 41.5
वर्धा – 42
वाशिम – 39.2
यवतमाळ – 42.5