पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवकाळी पावसामुळे मराठवाडा, विदर्भातील उन्हाचा पारा खाली आला. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोवा येथे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, पुढील 24 तासात ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात आज ….. सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.
उन्हाचा वाढता चटका अंगाची लाहीलाही करत असून, 40 ते 42 अंशावर असलेले कमाल तापमान सोसेनासे झाले आहे. एप्रिलच्या मध्यानंतर कमाल तापमानात आणखी वाढ होऊ शकते. तापलेला विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने थंड केले आहे. त्यामुळे मागील आठवड्यात कमाल तापमान 43 अंशावरून थेट 35 अंशाच्या खाली गेले. मात्र, गेल्या 24 तासांत अवकाळी पावसाचा कमी झाल्यामुळे कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. परंतू, मराठवाडा आणि विदर्भापेक्षा यंदा मध्य महाराष्ट्र चांगलाच तापला आहे.
पुणे, अहमदनगर, जळगाव, मालेगाव, सोलापूर, सातारा, सांगली आणि नाशिक जिल्ह्यांत कमाल तापमान 39 ते 42 अंशापर्यंत नोंदविण्यात आले आहे. दुपारचा उन्हाचा चटका आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्यात आकाश निरभ्र आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ठाणे, रायगड आणि मुंबईमध्ये उष्णतेची लाट येईल. तर धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली असून, या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.