अनिल देशपांडे
राहुरी – राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे. राजकीय पक्ष व वैयक्तिक प्रतिमा या मुख्य आधाराने ही निवडणूक लढविली जात आहे. निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांच्या भूमिका व स्थानिक प्रश्नांचा प्रभाव असून त्या आधाराने प्रचार झाला. गेल्या निवडणुकीत आमदार शिवाजी कर्डिले यांना 91 हजार 454 मते 47.09 टक्के एवढी मते मिळाली होती. शिवसेनेच्या डॉ.उषाताई तनपुरे यांना 65 हजार 778 मते 33.87 % मिळाली होती तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजी गाडे यांना 24 हजार 143 मते 12.43 टक्के मते मिळाली होती. दोन प्रमुख विरोधी उमेदवारांचे मतांची बेरीज केली तरीही कर्डिलेंची मतांची टक्केवारी थोडीशी का होईना जास्तच आहे. त्यात वाढ करण्याचे आव्हान आ.कर्डिलेंसमोर आहे.
यंदा मुख्य लढत दुरंगी असल्याने अधिक मते आपल्याकडे खेचण्याचे आव्हान प्राजक्त तनपुरेसमोर आहे. गेल्या निवडणूकीत अन्य सात उमेदवारांना सहा हजार 169 फक्त 3.18 टक्के मते मिळाली होती. मतदानाची टक्केवारी 71 टक्के होती. यावेळी मुख्य लढत दुरंगी असून त्यामुळे आ. कर्डिले हॅटट्रिक साधतात की तनपुरे त्यांची वाट रोखतात हे निवडणूक निकालानंतर समजेल.
स्थानिक प्रश्नांचा प्रभाव असल्याने प्रचारात त्यावरच अधिक भर दोन्हीही बाजूने होता. जायकवाडीला जाणारे पाणी, मुळा धरणाचे आवर्तन, वांबोरीचारी, राहुरी एम.आय.डी.सी, ग्रामीण रुग्णालय, एसटी डेपो, राहुरीची पाणीपुरवठा योजना अशा प्रश्नांवरुन प्रचारात आरोप- प्रत्यारोप झाले. हे प्रश्न सोडविण्यात आमदारांना अपयश आले. त्यामुळे आपल्याला संधी दिली जावी, असा दावा आघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला. आता नको गुन्हेगार आमदार, आता हवा राहुरीचा आमदार यावर त्यांचा भर होता. प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी माजीमंत्री शरद पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी प्रचारसभा घेतल्या. तर मुख्यतः भर वैयक्तिक गाठीभेटी, कॉर्नर सभा यावर होता.
आ. कर्डिले यांची उमेदवारी फार आधीच निश्चित होती. त्यामुळे प्रचारात त्यांची स्वाभाविक आघाडी आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रचारसभा झाल्या. दहा वर्षात आपण गावोगाव केलेल्या विकास कामांच्या आधारावर आपण निवडणुकीस सामोरे जात आहोत. पंचवीस वर्षे तनपुरेंनी मतदारसंघाचे प्रश्न सोडविले नाहीत. म्हणूनच तर मतदारांनी त्यांना नाकारले. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणार आमदार कोण आहे. माझी कामांची पध्दत जनतेने अनुभवली आहे.
मी जर गुन्हेगार असतो तर दहा वर्षे लोकांनी मला निवडून दिले असते का? असा सवाल आ.कर्डिले यांनी अनेक सभांमध्ये केला. जनता माझ्या पाठीशी आहे. केवळ खोटे आरोप केल्याने जनता भुलणार नाही. माझ्याकडून कोणालाही त्रास झाला असे दाखवून द्या, मी निवडणुकीतून माघार घेईल. पंचवीस वर्ष त्यांना काही करता आले नाही. ते काम या सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात केली. समन्यायी पाणी वाटप हे राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे पाप. नगराध्यक्षांना पालिकेत प्रश्न सोडविता आलेले नाहीत. ते तालुक्याचे प्रश्न काय सोडविणार.
जे नेते जनतेला कधी मोबाईल फोनवर उपलब्ध नाहीत, ते जनतेसाठी मदतीला कधी धावून येणार असे मुद्दे आ.कर्डिलेंनी प्रचारात ठिकठिकाणी मांडले. मतदारसंघात निळवंडेची कामे वेगाने सुरु आहेत. राहुरीची पाणीयोजना याच सरकारने मंजूर केली. वांबोरी चारी दुसऱ्या टप्पाची मंजुरी आम्हीच आणली. यावरही त्यांचा भर राहीला. भाजप-शिवसेना, रासप, विकास मंडळ असा संघटित पाठिंबा कर्डिले यांच्या मागे आहे.
खासदार डॉ.सुजय विखे व माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी आहे. ती ताकद पूर्णपणे कर्डिलेंच्या बाजूने आहे. ज्येष्ठ नेते अँड.सुभाष पाटील, आ. कर्डिलेंच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत. रासपचे शरद बाचकर व शिवसेनेचे रावसाहेब खेवरे ही प्रचारात सक्रीय झाले आहेत. शिवाजी गाडे यांची अनुपस्थिती व त्यांचे मंडळाची भुमिका व त्या मतदारांना कोण आपल्याकडे अधिक वळविणार हे निर्णायक ठरु शकते. व्यापक जनाधार ही आ. कर्डिंलेंची मोठी जमेची बाजू आहे. केवळ महिनाभराचे प्रचारावर मतपरिवर्तन होतेच असे नाही. स्थानिक जनतेने दोन्ही नेत्यांना जवळून अनुभवलेले आहे.
प्रश्नांची सोडवणूक करण्याची प्रत्येकाची पद्धत जनतेच्या जमेस आहे. कामातून तयार झालेली नेत्यांची प्रतिमा सावलीसारखीच प्रत्येका सोबत असतेच. आघाडी व महायुतीची सरकार या दोन्हीही सरकारांना जनतेने अनुभवले आहे. तो मतदानात महत्वाचा घटक आहेच. खरेतर पक्ष आणि वैयक्तिक प्रतिमा या आधारावर लोकांची मते उमेदवार ठरले त्याच वेळेस निश्चित झालेली आहेत.
राहिला विषय तरंगत्या मतदारांचा.
तो अधिक आपल्याकडे कोण खेचून घेईल यावर खरे ते विजयश्री अवलंबून आहे. या पाच वर्षात पन्नास हजार तरूण मतदारांची संख्या वाढलेली आहे. या युवा मतदारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे. ही तरुणांची मते कोण अधिक प्रमाणात खेचतो. यावर बरेचसे अवलंबून आहे.सलग तीन निवडणुकात मतदारांनी तनपुरे नाकारलेले आहे. यावेळी एकास एक लढत देताना नगराध्यक्ष तनपुरे कर्डिले यांची हॅंटट्रीक करण्याची वाट रोखतात की त्यांचे हे आव्हान आ. कर्डिले समर्थपणे पेलतात. हे निकालानंतरच समजेल.