नगर – नगर शहर उपनगरातील रस्त्यांची चाळण झाली असतांना अनेकदा निवेदने देवूनही त्याकडे मनपा लक्ष देत नाही. निविदा काढावी लागेल ,आचारसंहिता सुरू आहे अशी नाना कारणे द्यायला सुरवात होते. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, मात्र एखादा रस्ता रात्रीतून तयार झाला तर मग मात्र त्या रस्त्यावर राहणाऱ्यांच्या आनंदाला पारावार रहात नाही . अर्थात ते त्या रस्त्याचे भाग्यच म्हणावे लागेल.
सेंटमोनिका रस्त्यावर अनेक वसाहती झाल्या त्यातल्याच एका वसाहतीत जाणाऱ्या जोड रस्त्याचे भाग्य असेच फळफळले असे म्हणायला हवे, कारण हा रस्ता इतर रस्त्यांप्रमाणेच बऱ्याच दिवसापासून नादरूस्त होता. मात्र काल दुपारी तेथे मोठी खडी येवून पडली सायंकाळच्या दरम्यान बारीक खडीचा डंपर हजर झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर रस्ता तयार कोणा उमेदवाराची कृपा या भागातील मतदारांवर झाली असेल अशी पुसटशी शंका मनात येवून गेली.
पण झालं बिचाऱ्या मतदारांचा प्रश्न मिटला असे म्हणून मनाची समजूत घातली. पण प्रश्न स्वस्थ बसू देईनात म्हणून मनपात चौकशी केली असता तेथील अभियंत्यानेही कानावर हात ठेवले.
कोणाच्या तरी कृपेने रस्ता झाला ना असे म्हणून मनाची समजूत घातली आणि सहजच असेच रोज एका रस्त्याचे भाग्य उजळले तर किती बरे होईल. किमान पाच वर्षातून एकदातरी संपूर्ण शहराचे भाग्य फळफळेल आणि रात्रीतून नगरचे रस्ते चकाचक होतील.