बुध (प्रतिनिधी) – हुमणीचे नियंत्रण करुन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक हुमणी किड नियंत्रण उपाययोजना राबविणे हे अत्यंत आवश्यक आहे. हुमणीचा समुळ नाश करुन नियंत्रण करणे ही काळाची गरज बनत चालली आहे, असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी केले. खातगुण (ता. खटाव) येथे हुमणीचे भुंगे नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिक दाखविताना ते बोलत होते.
कृषी विभागातर्फे हुमणी किड नियंत्रण मोहिम सुरु असून खटाव तालुक्यातील ऊस, आले, मका या पिकावरती हुमणीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने ही मोहिम प्रभाविपणे राबवण्यात येत आहे. खातगुण येथील शेतकरी जयवंत लावंड या शेतकऱ्याच्या बांधावर असणाऱ्या कडुलिंब झाडावरील हुमणी किडीचे भुंगे नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिक मोहिम राबविण्यात आली.
हुमणी किडीचे भुंगे रात्रीच्यावेळी कडुलिंबाच्या पानाचे कोवळे शेंडे खाण्यासाठी जमिनीतून बाहेर पडतात. सायंकाळी लांवड यांच्या बांधावरील कडुलिंबाच्या झाडावरील आलेल्या हुमणी किड्याचे भुंगे काठीने खाली पाडुन कीटकनाशकामध्ये नष्ट करण्यात आले. याप्रसंगी म्हेत्रे यांनी एकात्मिक हुमणी किड नियंत्रणच्या उपाययोजनेविषयी सविस्तर माहिती दिली. तर खटावच्या कृषी सहाय्यिका रुपाली पंडीत यांनी एरंडी आंबवण व प्रकाश सापळे याविषयी मार्गदर्शन केले.