पुणे – सणांच्या निमित्ताने नागरिक खरेदीसाठी घराबाहेर हळूहळू पडत आहेत. त्यामुळे दुकानांची वेळ रात्री 9 वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून देखील करण्यात येत होती. शुक्रवारी महापालिकेने यासंदर्भातील निर्णय जाहीर केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून दुकाने बंद होती. आता, अनलॉकमुळे दुकाने देखील पूर्वपदावर येत आहेत. सहा महिने सामसूम असणाऱ्या बाजारपेठेत पुन्हा एकदा खरेदीची लगबग काही प्रमाणात दिसू लागली आहे.
मात्र, अनेक ठिकाणी सध्या ग्राहकांचा प्रतिसाद देखील तुरळक असल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. याच पार्श्वभूमीवर रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत होती.
गृहिणींकडूनही स्वागत…
रात्री 7 वाजताच दुकाने बंद होत असल्याने गृहिणींना किराणामाल व अन्य पदार्थ खरेदी करण्यास पुरेसा वेळ मिळत नव्हता. आता, रात्री 9 पर्यंत परवानगी मिळाल्याने निवांतपणे खरेदी करता येईल, अशी भावना गृहिणींनी व्यक्त केली. नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी अशा येऊ घातलेल्या सणासुदीच्या काळात दुकानात मोठ्या प्रमाणात कापड, मिठाई, होम अप्लायन्सेसची खरेदी केली जाते, अशावेळी रात्री 7ची वेळ अपुरी ठरू शकली असती व कमी वेळेमुळे गर्दी होण्याचा धोकाही असतो. तो काही अंशी टळेल.
व्यापारी आवश्यक असणारी काळजी घेत व्यवसाय करत आहेत. सायंकाळी 7 नंतर खरेदीसाठी नोकरदार नागरिकांना आता वेळ मिळेल. वेळ वाढविल्याने सुट्टीच्याच दिवशी होणारी गर्दी देखील कमी होईल. यातून व्यापाराला चालना मिळणार आहे.
– नितीन पंडीत, अध्यक्ष, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन
दुकानांना रात्री 9 पर्यंत परवानगी दिली. याबद्दल मी सर्वप्रथम प्रशासनाचे आभार मानतो. परंतु, बारला सर्वात आधी रात्री 10 पर्यंत परवानगी दिली, त्यावेळी दुकानांना रात्री 7 वाजताच दुकाने बंद करण्याचे फर्मान होते. बार ही काही अत्यावश्यक सेवा नसून ती बंद राहिली असती तरी काहीही फरक पडला नसता. दुकानांबाबत करण्यात आलेला दुजाभाव खटकत होता.
– सूर्यकांत पाठक, व्यापारी