मुंबई – अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे.
नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज नितेश राणेंच्या वतीने ज्येष्ठ वकील नितीन प्रधान यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता हायकोर्टाचे कामकाज सध्या दुपारी 12 ते 3 या वेळेत सुरू असल्याने वेळेअभावी ही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. यावरील पुढील सुनावणी गुरूवारी दुपारी 1 वाजता न्यायमूर्ती सी.वी. भडंग यांच्यापुढे पुन्हा होणार आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रणघुमाळीत शिवसेनेचे कार्यकर्ते संतोश परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच आहेत असा दावा करत राज्य सरकारने या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात विरोध केलेला आहे. ही घटना 8 नोव्हेंबर 2021 रोजी घडली होती.