नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या (बुधवार) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याबद्दल ईडीने २१ मार्चला केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
संबंधित अटक आणि कोठडी अवैध असल्याची भूमिका घेत केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेतून तातडीने सुटकेची विनंती करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या वतीने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती.
पण, होळीनिमित्त न्यायालयाला सुटी असल्याने तातडीने सुनावणीची मागणी अमान्य करण्यात आली. आता उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी उद्या सकाळी १०.३० वाजताची वेळ निश्चित केली आहे. ईडीने अटक केलेले केजरीवाल हे पहिलेच विद्यमान मुख्यमंत्री ठरले आहेत.
अटकेची कारवाई झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. मात्र, केजरीवाल हेच मुख्यमंत्रिपदी राहतील आणि तुरूंगात रवानगी झाली तरी तिथून सरकारचे कामकाज पाहतील अशी भूमिका आपने घेतली आहे.