89 संशयीत अजूनही विलगीकरणात
नगर -करोनाबाधित असल्याच्या संशयावरून किंवा बाधितांच्या संपर्कात आलेल्या नगर जिल्ह्यातील 676 जणांची आतापर्यंत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या सर्वांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये आज अखेर 22 रुग्णांना करोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
तपासणी अहवालात तब्बल 618 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचेही स्पष्ट झाले आहे. तथापि, पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेतून अजून 31 जणांच्या तपासणी अहवालाची जिल्ह्यात प्रतीक्षा आहे. नगरमधील वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्या भागातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली असून, तेथे राज्य राखीव दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्याआहेत.
हा संपूर्ण परिसर शंभर टक्के लॉकडाऊन ठेवण्यावर जिल्हा प्रशासनाचा विशेष भर आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून 468 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. तसेच 89 संशयित जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी (दि.5) रोजी नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील आलमगीर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तेथील नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या 55 स्राव चाचणी नमुन्यांपैकी 55 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले.
ते सर्वच अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने आजचा दिवस नगरकरांसाठी सुखद ठरला. तसेच 195 जणांनी क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. तसेच आज पाठविण्यात आलेल्या 31 जणांचे आहवाल येणे बाकी आहेत. प्रशासनाकडून करोनाबाबत मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अनेकांची वाहने जप्त करून कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
पोलिसांनी अडविले जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन..!
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत. लॉकडाऊनच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रात्रंदिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ते रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ते खासगी वाहनांचाही वापर करत आहेत. ते शहरात खासगी वाहनातून फिरत असताना त्यांचे वाहन पोलिसांनी अडविले. त्यामुळे पोलीस प्रशासनही चोख कामगिरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.