पुणे – दरवर्षी डिसेंबरपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरुवात होते. यंदा मात्र या परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. मागील वर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्याने यंदा पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई समस्या निर्माण झाली नाही. 2019 मध्ये एप्रिल महिन्यातच 119 टॅंकरद्वारे जिल्ह्यातील 2 लाख 18 हजार नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागत होता. चांगला पाऊस झाल्याने यंदा आजमितीस जिल्ह्यात एकही टॅंकर सुरू करावा लागला नाही. त्यामुळे नेहमी दुष्काळी झळ सोसावी लागणाऱ्या गावांमध्ये यंदा दिलासादायक चित्र दिसत आहे.
अपुरा पाऊस अथवा परतीच्या पावसाने पाठ फिरवली तर जिल्ह्यात पाणीटंचाई भासू लागते. पिण्यासाठी नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागतो. परतीच्या पावसावर अवलंबून असलेल्या बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये डिसेंबर-जानेवारीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. तर उर्वरित काही तालुक्यांमध्ये मार्च-एप्रिलमध्ये टॅंकर सुरू
करावा लागतो. काही गावांमध्ये आठ ते नऊ महिने टॅंकरने पाणीपुरवठा होतो.