नवी दिल्ली -आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे चिन्ह कमळालाच प्रत्येक जागेवरील उमेदवार माना. पक्षचिन्हाच्या विजयाची निश्चिती करा, असे आवाहन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा प्रारंभ शनिवारपासून झाला. त्याआधी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोदींनी मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीत भाजपने ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
तो केवळ आकडा नसून ते भावनेचे प्रतीक आहे. पक्षाचे महत्वाचे प्रेरणास्त्रोत असणाऱ्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरशी संबंधित राज्यघटनेचे कलम ३७० हटवण्यासाठी आणि देशाचे अखंडत्व अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
त्यामुळे भाजपने ३७० जागा जिंकण्याची बाब मुखर्जी यांना खऱ्याअर्थी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मोदी सरकारने याआधीच हटवले आहे.
निवडणुकीसाठीची प्रचार मोहीम विकासाच्या अजेंड्याभोवती गुंफण्याचे आवाहनही मोदींनी केले. विरोधक तू-तू-मैं-मैं मध्ये व्यस्त राहतील आणि अनावश्यक मुद्दे उपस्थित करतील. मात्र, आपण विचलित न होता विकासाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रित करायचे.
केंद्रातील आपल्या सरकारने विकासासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी अनेक पाऊले उचलली. तसेच, जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. संबंधित बाबींवर प्रचारावेळी जोर दिला जावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मोदींनी १० वर्षे पंतप्रधानपद भुषवण्याआधी १२ वर्षांपेक्षा अधिक काळ गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्याचा संदर्भ त्यांनी भाषणात दिला. आपला तो प्रदीर्घ कार्यकाळ आरोपमुक्त आणि विकासयुक्त असल्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.